नवी दिल्ली :  मोदी सरकारला तीन वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं प्रमुख विरोधी पक्ष असणा-या काँग्रेसच्या तरूण खासदारांनी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलं. काँग्रेसच्या दिल्ली मुख्यालयातल्या पत्रकार परिषदेत तीन वर्षांत केंद्र सरकारनं केलेल्या 30 चूकांचा पाढा वाचण्यात आला. मोदी सरकारच्या निर्णयांमधला विसंगतपणा अधोरेखित करण्याचाही प्रयत्न झाला.


पाकिस्तानविषयीचं धोरण असो, की खादीचा प्रचार, पीक विमा असो की गोवंश हत्याबंदीचा विषय, प्रत्येक ठिकाणी सरकारी भूमिका वादग्रस्त असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. पत्रकार परिषदेला ज्योतिरादित्य शिंदे, सचिन पायलट, रणदीप सुर्जेवाला यांच्यासह काँग्रेसचे सगळे तरुण खासदार या पत्रकार परिषदेला हजर होते.