हैदराबाद : येथील मंदिरांमध्ये गायी आणि म्हशीचे मांस ठेऊन शहरात दंगली घडवून आणण्याचा इस्लामिक स्टेटचा (आयएस) या दहशतवादी संघटनेचा कुटील डाव होता, अशी माहिती तपासात उघड झालेय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रमजानच्या पवित्र महिन्यात हैदराबादमधील चारमिनारजवळ असलेल्या भाग्यलक्ष्मी मंदिरात गोमांस आणि म्हशीचे मांस ठेवायचे आणि त्यानंतर शहरात दंगल घडवून आणण्याचा  डाव होता. मंदिराबरोबरच व्हीव्हीआयपी, मॉल्स, शॉपिंग सेंटर आणि चारमिनारच्या आजूबाजूची ठिकाणंही उदध्वस्त करण्याचा त्यांचा डाव होता, अशी माहिती एनआयएच्या सूत्रांनी दिली. 


हैदराबादमधून इसिससंबंधित ११ जणांना ताब्यात घेण्यात आले. त्यांची चौकशी सुरु आहे. दरम्यान,  राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) सूत्रांनी सांगितले की, मांस ठेऊन शहरात दंगली घडवून आणण्याचा इस्लामिक स्टेटचा (आयएस) या दहशतवादी संघटनेचा वाईट हेतू होता.


बुधवारी हैदराबादेतील मीरचौक, मोघलपुरा, बरकास आणि जुन्या हैदराबाद परिसरात छापे टाकून 'आयएस'शी संबंधित ११ संशयितांना ताब्यात घेतले. गेल्या चार-पाच महिन्यांपासून  त्यांच्यावर नजर ठेवण्यात आली होती.


पकडण्यात आलेले तरुण 'आयएस'चा हस्तक शफी अरमर याच्याशी संपर्कात होते. २५ जून रोजी दूरध्वनीवरील संभाषण ऐकल्यानंतर संशय बळावला. त्यानंतर एनआयएनं या ११ जणांना ताब्यात घेतले गेले. याबाबत 'टाइम्स ऑफ इंडिया'ने वृत्त दिलेय.  


'बीफ बॉम्ब'चा वापर करून दंगली घडवण्याचा कट होता, असे त्यांच्या चौकशीतून पुढे आलेय. अटकेत असलेल्या या तरुणांपैकी एकाने दुसऱ्या एकाला गाय आणि म्हशीच्या मांसाचे तुकडे सोबत आणण्यास सांगितले होते. काही दिवसांतच 'बीफ'बॉम्बचा हा स्फोट घडवून आणण्याची तयारी सुरू होती. यासाठी दुबईहून पैसाही पाठवला जाणार होता.  


पकडण्यात आलेले पदवीधर आहेत. तसेच सर्वजण नोकरी करतात. काहीजण अभियंते आहेत. विशेष म्हणजे या सगळ्यांची कौटुंबिक स्थिती सदन आहे.