नवी दिल्ली : जल्लीकट्टूच्या समर्थनात चेन्नईत सुरू झालेलं आंदोलन आता तमिळ अस्मितेचं आंदोलन बनत चाललंय. त्यात आता सर्वोच्च न्यायायलायनं घेतलेल्या निर्णयानं आंदोलनाला दिलासा मिळण्याची शक्यता आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कारण जल्लीकट्टूविषयीचा निकाल आठवड्याभरासाठी पुढे ढकलण्यात आलाय.  सरकारनं त्याविषयी सर्वोच्च न्यायालयानं विनंती केली होती. ही विनंती मान्य करण्यात आलीय. त्यामुळे आता राज्य सरकारला अध्यादेश काढता येणार आहे.  तमिळनाडूतले झाडून सगळे सेलिब्रिटीज जलईकट्टूच्या समर्थनात मैदानात उतरलेत.


जग प्रसिद्ध संगीतकार ए आर रहमान, अभिनेता कमल हसन, विश्वविजेता बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद,  आर्ट ऑफ लिव्हिंगचे श्री श्री रविशंकर एक ना अनेक दिग्गजांनी जल्लीकट्टूचं समर्थन केले आहे. चेन्नईच्या मरिना बीचवर शांततामय आंदोलनाचा आजचा तिसरा दिवस आहे. राज्यातला प्रमुख विरोधी पक्ष द्रमुकनं आज सकाळीच रेलरोको आंदोलन सुरु केलंय.


द्रमुकचे कार्यकारी अध्यक्ष एम के स्टालिन यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यांची बहिण आणि खासदार कनिमोळी, माजी केंद्रीय टेलिकॉम मंत्री दयनिधी मारन यांच्यासह द्रमुकचे हजारो कार्यकर्ते आज आंदोलनात उतरलेत.


दरम्यान पंतप्रधानांशी चर्चेनंतर आज सकाळी मुख्यमंत्री पनीर सेल्वम यांनी जलईकट्टूवरची बंदी उठवण्यासाठी नवा अध्यादेश काढण्यात येईल असं आंदोलकांना सांगितले. अध्यादेशाचा मसूदा केंद्राकडे पाठवण्यात आला असून येत्या दोन दिवसात त्याला मंजुरी मिळाली की लगेच तो जारी करण्यात येईल असं पनीरसेल्वम यांनी म्हटले आहे.


जलईकट्टूच्या समर्थनार्थ आज एक दिवसाचा ए आर रहमान एक दिवसाचा उपवास करणार आहे. जलईकट्टूच्या खेळात बैलांवर अत्याचार होत असल्याचं सांगत प्राणीप्रेमी संघटनांनी केलेल्या याचिकेनंतर सर्वोच्च न्यायालयानं खेळावर बंदी घातली. 


शिवाय तमिळ अस्मितेवर घाला घातला जात असल्याचा दावा करून राज्यातल्या तरुणाईला आंदोलनात सामील होण्याचं आवाहनही करण्यात येतय.. त्याला राज्यभरातून मोठा प्रतिसादही मिळतोय. तमिळ सेलिब्रिटी आणि समाजातल्या महत्वाच्या व्यक्ती भूमिका घ्यायला कधीच मागे पुढे बघत नाहीत...त्याचाच प्रत्यय या आंदोलनातही येतोय.