नाशिक : देशभरात चर्चेत असणाऱ्या 'गुजरात मॉडेल'पेक्षा 'महाराष्ट्र मॉडेल' जास्त सरस असल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी नाशिक येथे केला. राज्यात गेल्या वर्षभरात झालेल्या विकासकामांमुळे राज्याचा विकासदर पहिल्यांदाच ८% इतका झाला, असं ते म्हणाले. भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत ते बोलत होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'महाराष्ट्राची वाटचाल संक्रमावस्थेतून सुरू आहे. राज्यातील ४० पैकी २७ हजार गावांत दुष्काळ आहे. दुष्काळावर मात करतानाच दीपस्तंभासारखे मार्गदर्शक ठरावे असे निर्णय सरकारने घेतले आहेत. त्यामुळे एका वर्षात महाराष्ट्राचा विकासदर पाच टक्‍क्‍यांहून आठ टक्‍क्‍यांपेक्षा जास्त आहे. जो देशाच्या आणि शेजारील प्रगत समजल्या जाणाऱ्या गुजरात राज्यापेक्षाही जास्त आहे. १५ वर्षांत प्रथमच महाराष्ट्राने हा विकासदर गाठून विपरीत स्थितीत राज्याला पुढे नेता येते, हे दाखवून दिले आहे,' असं मुख्यमंत्री म्हणाले.


काँग्रेस सरकारने दिलेली कर्जमाफी उपयोगाची नसून शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याची गरज असल्याचं ते म्हणाले. शेतीला पूरक उद्योगाची साथ देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. असे न केल्यास शेतकरी राजा होण्यापक्षा दलालच मोठे होतील असे ते म्हणाले. या भाषणादरम्यान त्यांनी राज्य सरकारच्याच जलयुक्त शिवार योजनेचे महत्त्व मांडले. विदर्भ - मराठवाड्याला ३२०० कोटी रुपये दिल्याचाही उल्लेख त्यांनी केला. पाच वर्षांनी देशातील सर्वात चांगले रस्ते महाराष्ट्रात असतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 


या कार्यक्रमाला भारतीय जनता पक्षाचे राज्यातील अनेक नेते आणि सरकारमधील मंत्री उपस्थित होते.