नांदेड : मराठवाड्यामध्ये गेल्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसानं जवळपास ३७० गाव आणि शिवाराला झोडपलंय. यामध्ये ७९ हजार हेक्टरवरील पिकांचं नुकसान झाल्याचं प्राथमिक पंचनाम्यातून समोर आलंय. अवकाळी आणि गारपिटीनंतर तब्बल आठवड्याभरानंतर औरंगाबादच्या विभागीय आयुक्तालयात प्राथमिक अहवाल पूर्ण झालाय. हा आकडा प्राथमिक असून पूर्ण पंचनामे झाल्यानंतर नुकसानीचा आकडा अधिक वाढणार आहे.


मराठवाड्यातील बीड, लातूर, परभणी, उस्मानाबाद, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यांतील ३६ तालुक्यांमध्ये १५ आणि १६ मार्च रोजी अवकाळी पावसासह गारपीट झाली. त्यात गहू, ज्वारी, हरभरा आणि फळपिकांचेही मोठे नुकसान झाले. यात सर्वाधिक २७ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान एकट्या लातूर जिल्ह्यात झाले आहे. यापाठोपाठ बीड जिल्ह्यात २३ हजार २२९ आणि परभणी जिल्ह्यात २२ हजार ५५० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. शिवाय ६ जणांना याकाळात आपला जीव गमवावा लागलातर २२ जण जखमी झाले. आता या शेतकऱ्यांना कधी मदत मिळणार हा प्रश्न कायम आहे.