जळगाव : सुरत-भुसावळ रेल्वे मार्गावर आज मोठा नवजीवन एक्स्प्रेसचा अपघात सुदैवाने टळला आहे. वेळ आली होती पण काळ आला नव्हता अशी म्हणण्याची वेळ आली आहे. अमळनेर तालुक्यातील पाडसे गावाजवळ ही घटना घडली. मोटरमनच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले आहेत. सुरत-भुसावळ मार्गावरील पाडसे रेल्वे स्टेशनजवळ रेल्वे लाईनचं काम सध्या सुरू आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हे काम सुरू असताना एक लोखंडी पोल नवजीवन एक्सप्रेसच्या इंजीनला धडकला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन नवजीवन एक्स्प्रेसच्या चालकाने गाडीचा वेग कमी केला, तोपर्यंत वेगामुळे तो पोल रेल्वे इंजीनने एक ते दीड किमी खेचत आणला होता. सुदैवाने वेग नियंत्रणात आल्याने गाडीचा समतोल राखला गेला आणि जीवित हानी टळली.


 या घटनेच्या चौकशीसाठी सुरत येथून  एक उच्च स्तरीय समिती घटनास्थळी दाखल झालीय. या घटनेमुळे नवजीवन एक्सप्रेसला अडीच तास उशीर झालाय. ही घटना साधारण चार ते पाच तासापूर्वी सुरत-भुसावळ रेल्वे मार्गावर झाली आहे. या घटनेमागे घातपात करण्याचा कोणाचा मनसुबा होता काय या दिशेनं देखील  रेल्वे पोलिसांनी तपास सुरू केला आहे.


नवजीवन एक्स्प्रेसला नवीन इंजीन लावून ही गाडी पुढे रवाना करण्यात आली आहे, दरम्यान या प्रकरणी कंत्राटदारावर गुन्हा दाखल होणार असल्याचं सांगण्यात येत आहे.