मुंबई : आयपीएल क्रिकेट सामन्यादरम्यान पाणी वापराबाबत मुंबई उच्च न्यायालायने एमसीएचे कान उपटलेत. आयपीएल क्रिकेट सामन्यांपेक्षा राज्यघटनेचं पाण्याचं धोरण महत्त्वाचं आहे असं उच्च न्यायालयाने सुनावलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दुष्काळाच्या मुद्द्यावरच्या सुनावणी उच्च न्यायालयाने सरकारला चांगलेच फटकारले. मॅच गरजेची आहे की पाणी, असा थेट सरकारला प्रश्न विचारला. जर आयपीएल सामन्यांसाठी गार्डनिंगसाठी पाण्याचा वापर करायचा असेल तर कारखान्यातले किंवा प्रक्रिया केलेले सांडपाणी वापरण्याचा सल्ला न्यायालयाने आयपीएल आयोजकांना दिलाय. यावर आज सुनावणी ठेवण्यात आली होती. 


आयपीएल सामन्यांसाठीचं पिच तयार करण्यासाठी लाखो लीटर पाण्याची गरज आहे. या संदर्भात केतन तिरोडकर यांनी न्यायालयात याचिका सादर केली होती. आयपीएल सामने महाराष्ट्रात आयोजित करायचे असतील तर आयपीएल प्रशासनाला राज्य सरकारने प्रत्येक लीटर मागे एक हजार रूपये पाणी कर आकारावा अशी मागणी करण्यात आली होती.


राज्यात मुंबई, नवी मुंबई आणि पुणे इथे आयपीएल सामने खेळवले जातात. २०१३ मध्ये आयपीएल सामन्यांसाठी या ३ स्टेडियमवर ६५ लाख लीटर पाणी केवळ पीच तयार करण्यासाठी वापरण्यात आले. तेवढंच पाणी यावर्षीही वापरावं लागणार आहे. त्यामुळे सध्याची दुष्काळी स्थिती लक्षात घेता हे सामने आयोजित करायचे झाल्यास आयपीएल प्रशासनाला लीटर मागे १००० रूपये पाणीकर आकारावा अशी मागणी करण्यात आलीय. तसंच दुष्काळग्रस्त भागातल्या कुटुंबांना दररोज १००० लीटर पाण्याचा पुरवठा करावा अशी मागणीही करण्यात आलीय.