नवी दिल्ली : इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेवर कब्जा केल्यानंतर आता वनडे आणि टी-२० मालिकेत यश मिळवण्यास टीम इंडिया सज्ज झालीये. इंग्लंडविरुद्धच्या तीन वनडे आणि तीन टी-२० सामन्यांसाठी आज टीम इंडियाची घोषणा कऱण्यात येणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बुधवारी महेंद्रसिंग धोनीने वनडे आणि टी-२०च्या कर्णधारपदाचा अचानकपणे राजीनामा दिला. त्यामुळे या मालिकेत टीम इंडियाचे नेतृत्व विराटकडे सोपवण्याची दाट शक्यता आहे. 


विराटकडे नेतृत्व देण्यात येणार असले तरी संघ निवड करणे सोपे असणार नाहीये. कारण टीम इंडियातील बरेच क्रिकेटपटू दुखापतग्रस्त आहेत. रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे दुखापतीमुळे टीमबाहेर आहेत. शिखर धवनचा खराब फॉर्म पाहता त्याच्या जागी लोकेशला संधी मिळण्याची शक्यता आहे. 


भारताचा अव्वल स्पिनर आर. अश्विन याच्याही संघातील सहभागाबाबत साशंकता आहे. कारण इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत दुखापत झाल्याने अश्विन तामिळनाडूकडून रणजी सामन्यांमध्ये खेळू शकला नव्हता. जडेजाला टीममध्ये संधी मिळण्याची शक्यता आहे. मोहम्मद शामी आणि धवल कुलकर्णी दुखापतीमुळे संघाबाहेर असल्याने जसप्रीत बुमराह आणि उमेश यादव यांना संधी मिळू शकते. 


एमएस धोनीने कर्णधारपदाचा राजीनामा दिला असला तरी खेळाडू म्हणून तो संघात खेळत राहणार आहे. दरम्यान, या मालिकेत सुरेश रैनाला निवड समिती संधी देणार की नाही हे पाहावे लागेल.