Makar Sankranti 2023 : हिंदू संस्कृतीमध्ये (Hindu religion) मकर संक्रांत (Makar Sankrant) या सणाचं अनन्यसाधारण महत्त्वं आहे. ज्योतिषविद्येपासून अगदी पौराणिक कथांमध्येसुद्धा या दिवसाचं महात्म्य सांगण्यात आलं आहे. असा हा सण दर वर्षी. 15 जानेवारीला साजरा होतो. यंदाची अतिशय मंगलमय पर्वाचा योग साधत हा सण साजरा केला जाणार आहे. देशभरात विविध राज्यांमध्ये विविध रुपांत साजरा केल्या जाणाऱ्या या सणाचं महत्त्वं आणि त्यामागं असणाऱ्या समजुतीसुद्धा तितक्याच वेगळ्या. दक्षिणेपासून ते अगदी देशाच्या उत्तरेपर्यंत या देशात संक्रांतीचा उत्साह यंदाही पाहायला मिळत आहे. 


संक्रांतीची नावं रुपं अनेक... 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कर्नाटकात संक्रांती, तामिळनाडू आणि केरळात पोंगल, पंजाब- हरियाणात माघी, गुजरात- राजस्थानमध्ये उत्तरायण, उत्तराखंडमध्ये उत्तरायणी, उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये खिचडी अशी या सणाची नावं (Makar sankranti in diffrent states)


ज्योतिषविद्यमध्ये (Astrology) सांगितल्यानुसार संक्रांत म्हणजे सूर्य किंवा कोणत्याही ग्रहाचा एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश. असं म्हणतात की, मकर संक्रांतीच्या दिवशी, सूर्य धनु राशीतून मकर राशीमध्ये प्रवेश करतो. या दिवसाला उत्तरायणही म्हणतात. या दिवशी दान, दक्षिणा देण्याचं प्रचंड महत्त्वं. असं म्हणतात की या दिवशी प्राण त्यागणाऱ्यांना मोक्षप्राप्ती होते. याच कारणामुळं महाभारतामध्ये वंदनीय असणाऱ्या पितामह भीष्म यांनीसुद्धा देहत्यागासाठी सूर्याच्या उत्तरायणाची प्रतीक्षा केली असं सांगितलं जातं. 


ही पौराणिक कथा अंगावर काटा आणतेय 


महाभारतातील (Mahabharata) युद्धामध्ये कौरवांच्या बाजुनं लढताना पितामह भीष्म यांना पाच पांडवांपैकी एका पांडवाचा म्हणजे अर्जुनाच्या धनुष्यातून निघालेला बाण लागला आणि त्यांना वीरगती प्राप्त झाली. पण, त्यांना बाण लागला तेव्हा सूर्य दक्षिणायनात होता. शास्त्रानुसार उत्तरायणात निधन झालेल्यांना जीवन- मृत्यूच्या चक्रातून सुटका मिळते. याच कारणामुळं पितामहांनी प्राण त्यागण्यासाठी सूर्याच्या उत्तरायणात येण्याची प्रतीक्षा केली. 


हेसुद्धा वाचा : Bhogi 2023 : आज भोगी! संक्रांतीच्या आदल्या दिवसाचं विशेष महत्त्वं काय, या दिवशी का केस धुतात? 


भीष्म पितामह (Bhisma Pitamaha) यांना इच्छामृत्यूचं वरदान प्राप्त होतं. त्यामुळं बाणांच्याच शय्येवर असतानाही त्यांनी देहत्यागासाठी प्रतीक्षा केली. जवळपास सहा महिने ते या शैय्येवर उत्तरायणाची प्रतीक्षा करत होते. यादरम्यान अखेरच्या घटका मोजत असताना त्यांनी पाच पांडवांना एक शेवटचा उपदेशही केला. सूर्यानं मकर राशीत प्रवेश करताच त्यांनी आभाळाकडे पाहत अखेरचा श्वास घेतला. म्हणूनच या अनन्यसाधारण महत्त्वं असणाऱ्या दिवसाला अनेक नव्या कामांची सुरुवात मोठ्या सकारात्मकतेनं केली जाते. 


(वरील माहिती पौराणिक कथांमधील संदर्भांच्या आधारे घेण्यात आली आहे. झी 24 तास याची खातरजमा करत नाही.)