Makar Sankranti 2023: पाश्चिमात्य नव्या वर्षात येणारा पहिला हिंदू सण म्हणजे मकर संक्रांत. नवीन वर्षाच्या दुसऱ्या आठवड्यात येणारा हा सण भारतामध्ये सर्वच राज्यांत फार उत्साहाने साजरा केला जातो. मकर संक्रांतीचा उल्लेक केल्यानंतर आवर्जून डोळ्यासमोर येणाऱ्या गोष्टी म्हणजे तिळगूळ, काळे कपडे आणि पतंग. तसे आपल्याकडे प्रत्येक सणासुदीला कोणते पदार्थ खायचे, कोणते कपडे परिधान करायेच या साऱ्या गोष्टी ठरलेल्या असतात. मात्र मकर संक्रांतीला सामान्यपणे अशुभ मानल्या जाणाऱ्या काळ्या कपड्यांना विशेष महत्त्व असतं. इतर सणांना काळे कपडे जाणीवपूर्वकपणे टाळले जतात. मात्र संक्रांतीला आवर्जून हे कपडे परिधान केले जातात. पण संक्रांतीला काळे कपडे का परिधान करतात याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? (why to wear black clothes on makar sankranti in marathi) यामागे एक पौराणिक आणि काही वैज्ञानिक कारणं आहेत. ही कारणं नेमकी कोणती जाणून घेऊयात.


पौराणिक कथेचा संदर्भ


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो. त्यामुळेच या संक्रमणाला मकर संक्रांत असं म्हटलं जातं. या दिवसाला दुसरं नाव उत्तरायण असंही आहे. हा दिवस हिवाळ्यामधील सर्वात थंड दिवस असतो. तसेच या संक्रमण कालावधीमधील २४ तासांमध्ये रात्रीच्या वेळा हा दिवसापेक्षा अधिक असल्याने रात्री मोठी असते. याच दिवशी काळे कपडे घालण्यामागे हे एक महत्तवाचं कारण असल्याचं सांगितलं जातं. एका पौराणिक कथेनुसार सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा त्याची पत्नी छाया म्हणजे सावलीने काळे वस्त्र परिधान केलं होतं. याचा संबंधही काळे कपडे परिधान करण्याशी जोडला जातो.


वैज्ञानिक कारण काय?


वैज्ञानिक कारणाबद्दल सांगायचे झाल्यास हा हिवाळ्यातील सर्वात थंड दिवस असतो. त्यामुळेच अधिक उष्णता शोषून घेणारे काळे कपडे या दिवशी आवर्जून परिधान केले जातात. इतर कोणत्याही रंगाच्या कपड्यांच्या तुलनेत उष्णता शोषून घेण्याची काळ्या रंगाची क्षमता अधिक असते. त्यामुळे शरीराला ऊब मिळते. काळ्या रंगाच्या कपड्यांचा फायदा शरीर उबदार ठेवण्यासाठी होतो. म्हणून अगदी लहान मुलांपासून वयस्कर लोकांपर्यंत सारेच जण या दिवशी काळ्या कपड्यांना प्राधान्य देतात.


सुगड्यांमधील पदार्थही असतात खास


विशेष म्हणजे केवळ कपड्यांच्या माध्यमातून नाही तर शरीर उबदार रहावे म्हणून सुगडीची पुजा करताना त्यात वापरल्या जाणाऱ्या आणि त्यानंतर सेवन केल्या जाणाऱ्या गोष्टीही शरीरातील उष्णता वाढवण्यास मदत करणाऱ्याच असतात. यामध्ये प्रामुख्याने ऊस, तिळगूळ, गाजर, बोरं, गव्हाच्या ओब्यांचा समावेश असतो. या पदार्थांच्या सेवनाने वातावरणातील थंडीला तोंड देण्यासाठी आवश्यक असणारी उष्णता शरीरातमध्ये निर्माण होते.