Asian Games : चीनमधील हांगझोऊमध्ये सुरु असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत क्रिकेट टीम इंडियाची विजयी घौडदौड सुरुच आहे. एशियन गेम्समध्ये सेमीफायनलच्या सामन्यात भारत विरूद्ध बांगलादेश यांच्या सामना रंगला होता. यावेळी टीम इंडियाने 9 विकेट्सने बांगलादेशाचा दारूण पराभव केला आहे. या विजयासोबत टीम इंडियाने फायनलचं तिकीट मिळवलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सेमीफायनलच्या सामन्यात भारताच्या गोलंदाजांनी उत्कृष्ट कामगिरी दाखवत बांगलादेशच्या फलंदाजांना केवळ 96 रन्सपर्यंत मजल मारता आली. टीमकडून साई किशोरने सर्वाधिक म्हणजेच 3 विकेट घेतल्या. तर वॉशिंग्टन सुंदरने 2 विकेट्स घेतले. 


सेमीफायनलच्या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार ऋतुराज गायकवाडने प्रथम टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. या सामन्यात टीम इंडियाच्या गोलंदाजांनी बांगालदेशी खेळाडूंची चांगलीच दाणादाण उडवली. बांगलादेशाकडून जाकर अलीने सर्वाधिक म्हणजेच 24 रन्स केले. यानंतर परवेझने 23 रन्स केले तर राकीबुलने 14 रन्सचं योगदान दिलं. याशिवाय कोणत्याही फलंदाजाला दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही. यावेळी 20 ओव्हर्समध्ये 9 विकेट्स गमावून 96 रन्स केले.


ऋतुराज-तिलकने मिळवून दिला विजय


यावेळी 97 रन्सच्या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाने शून्यावर पहिली विकेट गमावली. टीम इंडियाचा यशस्वी जयस्वाल शून्यावर बाद झाला. मात्र त्यानंतर कर्णधार ऋतुराज गायकडवाड ( 40 ) आणि तिलक वर्मा ( 55 ) नाबाद खेळी करत टीम इंडियाला 9 विकेट्सने विजय मिळवून दिला.


कशी आहे भारताची आतापर्यंतची कामगिरी


आतापर्यंत भारताने 86 पदके जिंकली असून त्यात 21 सुवर्ण, 32 रौप्य आणि 33 कांस्य पदकांचा समावेश आहे. क्रिकेटमध्ये भारत आणि बांगलादेश यांच्यात उपांत्य फेरीचा सामना होत आहे. टीम इंडियाचे खेळाडू कबड्डी आणि बॅडमिंटनमध्ये सेमीफायनलचे सामनेही खेळणार आहेत. त्याचवेळी हॉकीमध्ये भारताची सुवर्णपदकाची लढत होणार आहे.