Shubman Gill: बुधवारी आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स विरूद्ध गुजरात टायटन्स यांच्यात सामना रंगला होता. या सामन्यात 4 रन्सने दिल्ली कॅपिटल्सने गुजरातचा पराभव केला. आयपीएलमध्ये पहिल्यांदा टीमचं नेतृत्व करणाऱ्या शुभमन गिलचा यंदाच्या सिझनमधील हा 5 वा पराभव होता. या पराभवामुळे गुजरातच्या टीमची प्लेऑफमध्ये जाण्याची वाट अजून खडतर झालीये. या पराभवानंतर गुजरातचा कर्णधार शुभमन गिल काय म्हणाला ते पाहूयात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या सामन्यात शुभमन गिलने टॉस जिंकून दिल्लीच्या टीमला प्रथम फलंदाजीसाठी निमंत्रण दिलं. यावेळी दिल्लीने प्रथम फलंदाजी करत 224 रन्सचा डोंगर उभारला. गुजराकडून लक्ष्याचा पाठलाग करताना राशिद खान आणि डेव्हिड मिलरने चांगली झुंज दिली. मात्र त्यांना टीमला विजय मिळवून देता आला नाही. 


पराभवानंतर काय म्हणाला शुभमन गिल?


पराभवानंतर कर्णधार शुभमन गिल म्हणाला, “मला पराभवाचं वाईट वाटतंय पण हा सामना अप्रतिम होता. सर्व खेळाडूंनी दमदार खेळ दाखवला आहे. आम्हाला कधीच वाटलं नाही की आम्ही सामन्यातून बाहेर पडलो. जेव्हा तुम्ही अशा स्कोरचा पाठलाग करता तेव्हा तुम्हाला सतत मोठे फटके खेळावे लागतात, त्यामुळे चांगल्या धावा होत असतात.


शुभमनने गोलंदाजांवर फोडलं पराभवाचं खापर?


गुजरातच्या खेळाडूंनी सुरुवातीला दिल्लीच्या टीमला चांगलं नियंत्रणात ठेवलं होतं. पॉवर प्लेमध्ये गुजरातच्या गोलंदाजांनी 44 धावांच्या स्कोअरवर 3 विकेट्स घेतले होते. त्यानंतर दिल्लीची टीम 180 पर्यंतच मजल मारेल असं वाटत होतं. पण, ऋषभ पंतने उत्तम फलंदाजी केली. शुभमन गिलने गोलंदाजीबद्दल आपली बाजू मांडताना सांगितलं की, “एका टप्प्यावर आम्हाला वाटलं होतं की, आम्ही त्यांना 200 रन्सच्या आत थांबवू शकू. पण आम्ही शेवटच्या तीन ओव्हर्समध्ये खूप रन्स दिले.”


पंतने मोहित शर्माला चोपलं


गुजरातविरुद्धच्या सामन्यात ऋषभने अविश्वसनीय खेळी केली. दिल्लीचा 19 ओव्हरपर्यंत 193 स्कोर होता. यावेळी ऋषभ पंत आणि ट्रिस्टन स्टब्स मैदानात होते. या दोघांनी दिल्लीला 200 च्या जवळ आणलं. परंतु ऋषभने अखेरच्या ओव्हरमध्ये घाव घालण्याचा निर्णय घेतला अन् अखेरच्या ओव्हरमध्ये मोहित शर्माला तब्बल 31 रन्स चोपले. यामध्ये त्याने 4 सिक्स अन् एक फोर मारली. त्याच्या या आक्रमक खेळीमुळे दिल्लाला 224 रन्स करता आले.