नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे सीरीजनंतर बीसीसीआयने तीन टी-२० सामन्यांसाठी भारतीय संघाची सोमवारी घोषणा केली. या संघात ३८ वर्षीय आशिष नेहराने तब्बल आठ महिन्यानंतर पुनरागमन केलंय. मात्र, दुसरीकडे सुरेश रैना, युवराज सिंग आणि अमित मिश्रा यांना मात्र संघात स्थान देण्यात आलेले नाहीये.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संघनिवडीदरम्यान रैनाला संघात स्थान मिळेल अशी आशा होती. तसेच युवराजही पुनरागमन करेल असे वाटले होते. मात्र या दोघांनीही स्थान मिळालेले नाही. 


याआधीही ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे सामन्यांसाठीच्या निवडीदरम्यान टीम मॅनेजमेंटने यो-यो टेस्टमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा संघात समावेश केला होता. 


या यो-यो टेस्टमध्ये युवराज आणि सुरेश रैना यांची कामगिरी खराब राहिल्याने त्यांना संघात स्थान मिळालेले नाही. 


या टेस्टमध्ये बीसीसीआयच्या नियमानुसार पास होण्यासाठी १९.५ गुण मिळवणे गरजेचे असते. रिपोर्टनुसार युवराज सिंगला या टेस्टमध्ये १६ गुण मिळवता आल्याने त्याला संघात स्थान न दिल्याचे समजतेय.


काय आहे ही यो-यो टेस्ट


कोणत्याही दौऱ्यासाठीच्या संघनिवडीदरम्यान टीम मॅनेजमेंटकडून क्रिकेटर्सची यो-यो फिटनेस टेस्ट घेतली जाते. या फिटनेस टेस्टमध्ये पास झालेल्या क्रिकेटर्सनाही संघात स्थान दिले जाते. केवळ बीसीसीआयच नव्हे तर ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड क्रिकेट बोर्डाकडूनही ही टेस्ट घेतली जाते.


बीसीसीआयच्या नियमानुसार भारतीय खेळाडूंनी या टेस्टमध्ये पास होण्यासाठी १९.५ गुण मिळवणे गरजेचे असते. त्याखालील गुण मिळवणाऱ्या खेळाडूंना संघात स्थान दिले जात नाही. त्यामुळे प्रत्येक क्रिकेटर्ससाठी ही एक मोठी परीक्षाच असते. यात काही टेस्टचा समावेश केला जातो. उदाहरणार्थ रन बिटवीन द लाईन्स सारख्या टेस्ट घेतल्या जातात. 


केवळ क्रिकेटच नव्हे तर फुटबॉल आणि हॉकीच्या खेळाडूंचीही अशाच प्रकारे टेस्ट होते.