भारतीय क्रिकेट संघाचे माजी खेळाडू लक्ष्मण शिवरामकृष्णन यांनी समालोचक हर्षा भोगले यांच्यावर आक्षेपार्ह टीका केली आहे. हर्षा भोगले यांनी चेन्नई चेन्नई सुपरकिंग्ज (Chennai Super Kings) संघासंबंधी केलेल्या एका विधानावर नाराजी व्यक्त करताना त्यांनी ही टीका केली आहे. मुंबई इंडियन्सविरोधात वानखेडे मैदानात झालेल्या सामन्यात समालोचन करताना हर्षा भोगले यांनी चेन्नई संघाला आणखी 20 धावांची गरज असल्याचं मत मांडलं होतं. मैदानात दव येत असल्याने आणि गोलंदाजीचे जास्त पर्याय नसल्याने चेन्नईला मुंबईच्या फलंदाजांना रोखणं अवघड जाईल असं त्यांचं म्हणणं होतं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"206 ही चांगली धावसंख्या आहे. पण या खेळपट्टीवर दव येत असताना आणि गोलंदाजीचे जास्त पर्याय नसता चेन्नई संघ आणखी 20 धावांची गरज होती असा विचार करत असेल," अशी पोस्ट हर्षा भोगले यांनी एक्सवर शेअर केली होती. 


पण हर्षा भोगले यांची ही पोस्ट लक्ष्मण शिवरामकृष्णन यांना आवडली नाही. तुम्हाला चेन्नईच्या खेळाडूंना कमी लेखायला फार आवडतं असा संताप त्यांनी व्यक्त केला. माझ्यासोबतही तुम्ही असंच केला असा गंभीर आरोपही त्यांनी केला. पोस्टवर कमेंट करताना त्यांनी लिहिलं की, "तुम्हाला लोकांना चेन्नईच्या खेळाडूंना कमी लेखायला फार आवडतं. तुम्ही माझ्यासोबतही हेच केलं, पण आता सीएसकेसोबत नाही".



लक्ष्मण शिवरामकृष्णन एवढ्यावरच थांबले नाहीत. तुमचं भारतीय क्रिकेटप्रती काय योगदाने आहे अशी विचारणाही त्यांनी केली. 'खरंच विचार करतोय की, भारतीय क्रिकेटमध्ये तुमचं योगदान काय आहे,' असं त्यांनी पोस्टमध्ये लिहिलं आहे. पण नंतर त्यांनी आपली ही पोस्ट डिलीट केली. 


दरम्यान चेन्नईच्या गोलंदाजांनी हर्षा भोगले यांचं मत खोटं ठरवलं आणि चांगली कामगिरी केली. त्यांनी मुंबई संघाला 186 धावांवर रोखलं आणि 20 धावांनी हा सामना जिंकला. मुंबई संघ एका क्षणी एकही विकेट न गमावता 70 धावांवर होता. पण नंतर तीन चेंडूत 2 विकेट्स गमावले. रोहित शर्माने या सामन्यात शतक ठोकलं, पण त्याचा फायदा झाला नाही. रोहित शर्माने 63 चेंडूत 105 धावा केल्या. पण ईशान किशन वगळता कोणीही रोहित शर्माला सोबत देऊ शकलं नाही. 


मुंबईच्या पराभवानंतर माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी हार्दिक पांड्याच्या नेतृत्वावर टीका केली होती. फारच साामन्य गोलंदाजी आणि नेतृत्व असं ते म्हणाले होते.