India vs Bangladesh T20 series: भारत आणि बांगलादेश यांच्यातील T20 सामान लवकरच रंगणार आहे. या सामन्यापूर्वी ग्वाल्हेरच्या श्रीमंत माधवराव सिंधिया क्रिकेट स्टेडियमवर जोरदार कारवाई पाहायला मिळाली. अधिकाऱ्यानुसार, जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी त्यांच्या आदेशात विरोध प्रदर्शन आणि विशेषतः सोशल मीडियावर भडकाऊ पोस्ट पसरवण्यावर बंदी घातली आहे. हा आदेश 7 ऑक्टोबरपर्यंत लागू राहणार आहे. हिंदू महासभेने सामन्याच्या दिवशी म्हणजेच 6 ऑक्टोबर रोजी ग्वाल्हेर बंदची हाक दिली आहे. याशिवाय अन्य संघटनांनीही आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. याच सर्व पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.


पहिला T20 रद्द होणार?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या बांगलादेशात असलेल्या हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारप्रकरणी रविवारचा सामना रद्द करण्याची मागणी हिंदू महासभेने केली आहे. त्यांनी यासाठी बुधवारी निदर्शने देखील केली होती. एका अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, जिल्हा दंडाधिकारी आणि जिल्हाधिकारी रुचिका चौहान यांनी पोलिस अधीक्षकांच्या शिफारसीनुसार भारतीय नागरी सुरक्षा संहिता (BNSS) च्या कलम 163 अंतर्गत प्रतिबंधात्मक आदेश जारी केले.



स्टेडियममध्ये अनेक गोष्टींवर बंदी 


आदेशानुसार ग्वाल्हेर जिल्ह्याच्या हद्दीतील कोणत्याही व्यक्तीने सामन्यात व्यत्यय आणल्यास किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून धार्मिक भावना भडकावल्यास त्याच्यावर कारवाई करण्यात येईल. याशिवाय स्टेडियममध्ये आक्षेपार्ह किंवा भडकाऊ भाषा असलेले संदेश, बॅनर, पोस्टर्स, कट-आउट्स, झेंडे आणि इतर गोष्टींवरही बंदी घालण्यात आली आहे. या ठिकाणी सुरक्षा आणि वाहतूक व्यवस्थापनासाठी जवळ जवळ  1,500 अधिक पोलिस तैनात करण्यात येत असल्याची माहिती आहे. 


स्टेडियमचा इतिहास आहे खास 


ग्वाल्हेरचे श्रीमंत माधवराव सिंधिया क्रिकेट स्टेडियमचे नाव इतिहासात नोंदले गेले आहे. याच स्टेडियमवर क्रिकेटचा देव मानल्या जाणाऱ्या अर्थात सचिन तेंडुलकरने वनडे क्रिकेटमधलं पहिलं द्विशतक झळकावलं होतं. या सामन्यानंतर या स्टेडियममध्ये एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळला गेला नाही. या स्टेडियमऐवजी इंदूरमध्ये सामने होऊ लागले, त्यामुळे या मोठ्या स्टेडियमकडे दुर्लक्ष होऊ लागले.