India Vs South Africa Test Virat Kohli Major Injury Averted: दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा दुसरा कसोटी सामना जिंकून भारताने मालिका 1-1 बरोबरीत राखण्यात यश मिळवलं. अवघ्या दीड दिवसांमध्ये 33 विकेट्स गेलेला हा सामना भारताने 7 विकेट्स राखून जिंकला. खेळपट्टीच्या लहरीपणामुळे चर्चेत असलेल्या या कसोटीमध्ये अनेक रंजक गोष्टी घडल्या. यापैकी विराटबरोबर घडलेली एक गोष्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. 


विराटबरोबर घडला असाच प्रकार


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

श्रेत्ररक्षण करताना खेळाडू जेवढा फलंदाजाच्या जवळ उभा जेवढा त्याच्याकडे येणाऱ्या चेंडूवर रिअॅक्ट होण्यासाठी कमी वेळ असतो. त्यातही स्लीपमध्ये फिल्डींग करण्यासाठी विशेष कौशल्य लागतं. अगदी काही सेकंदात चेंडू स्लीपच्या फिल्डरकडे जातो. कॅच कसा घ्यावा हे ठरवण्यासाठी फिल्डरला क्षणभरही विचार करण्याचा उसंत नसते. त्यातही बॅटची कड लागून आलेले चेंडू पकडणं तर फार कठीण असतं. अनेकदा तर स्लीपमध्ये फिल्डींग करणाऱ्यांच्या शरीराला बॉल लागून ते जखमीही होतात. असाच काहीसा प्रकार दक्षिण आफ्रिकेविरुद्ध केप टाऊनमध्ये झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात विराट कोहलीबरोबर घडला.


नक्की काय झालं?


पहिल्या डावामध्ये दक्षिण आफ्रिकेचा संघ 55 धावांवर बाद झाला. जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर खेळताना डेव्हिड बेडिंगहॅमच्या बॅटची कड घेऊन बॉल विराटच्या अगदी समोर पडला. विराट कोहलीने हा बॉल थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र हा बॉल दोन्ही स्लीपच्यामधील गॅपमधून जात असताना विराटच्या हाताजवळ पडला. विराट हा बॉल पकडणार असं वाटत होतं. मात्र अचानक बॉल अनपेक्षितपणे बाऊन्स झाल्याने विराट गोंधळला. बॉल विराटच्या हाताला लागून चेहऱ्यावर लागला. विराटने पटकनं आपला चेहरा मागे घेतला. विराट कोहली हा भारतीय संघाच्या फलंदाजीमधील फार महत्त्वाचा खेळाडू आहे. त्यामुळे विराट अगदी थोडक्यात या चेंडूपासून आणि मोठ्या दुखापतीपासून बचावल्याची भावना चाहते व्यक्त करत आहेत. हा चेंडू जोरात लागला असता तर विराट नक्कीच गंभीर जखमी झाला असता. 



मैदानावरुन टीका


मैदानावर अनेकदा असं दिसून आलं की अनपेक्षितरित्या चेंडू उसळी घेत होता. तर कधी उसळीच घेत नव्हता. याच लहरीपणावर अगदी समालोचकांपासून ते माजी क्रिकेटपटू आणि सामन्यानंतर थेट भारतीय कर्णधार रोहित शर्मानेही टोला लगावला आहे. केवल 642 चेंडूंमध्ये दुसरा सामना संपला. या सामन्यामध्ये 4 डावांमध्ये एकूण 464 धावा दोन्ही संघांनी मिळून गेल्या. मात्र कसोटी सामने अशापद्धतीने संपत असतील तर ही भविष्यात कसोटी सामन्यांसाठी धोक्याची घंटा असल्याचं मत अनेक तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे.