कटक : श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या टी-20मध्ये भारताचा ९३ रन्सनी दणदणीत विजय झाला आहे. भारतानं ठेवलेल्या १८१ रन्सचा पाठलाग करताना श्रीलंकेची टीम १६ ओव्हरमध्ये ८७ रन्सवर ऑल आऊट झाली. भारताकडून युझुवेंद्र चहलनं सर्वाधिक ४ विकेट घेतल्या. तर हार्दिक पांड्याला ३ विकेट मिळाल्या. कुलदीप यादवला २ आणि जयदेव उनाडकटला एक विकेट घेण्यात यश आलं. चहलला मॅन ऑफ द मॅच देऊन गौरवण्यात आलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या मॅचमध्ये टॉस जिंकून श्रीलंकेनं पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला आणि भारतानं २० ओव्हर्समध्ये १८०/३ एवढा स्कोअर केला. भारताकडून के.एल.राहुलनं ४८ बॉल्समध्ये ६१ रन्स केल्या. राहुलच्या खेळीमध्ये ७ फोर आणि १ सिक्सचा समावेश होता. तर धोनीनं २२ बॉल्समध्ये नाबाद ३९ आणि मनिष पांडेनं १८ बॉल्समध्ये नाबाद ३२ रन्स केल्या. श्रेयस अय्यरनं २० बॉल्समध्ये २४ रन्स आणि रोहित शर्मानं १३ बॉल्समध्ये १७ रन्स केल्या.


श्रीलंकेच्या मॅथ्यूज, परेरा आणि फर्नांडोला प्रत्येकी एक विकेट मिळाली. यानंतर आता २२ डिसेंबरला इंदोरमध्ये तर २४ डिसेंबरला मुंबईमध्ये तिसरी टी-20 होणार आहे. टेस्ट आणि वनडे सीरिज जिंकल्यानंतर आता तीन टी-20 मॅचच्या सीरिजमध्ये भारतानं आघाडी घेतली आहे.