सेंच्युरिअन : पहिल्या वनडेपाठोपाठ दुसऱ्या वनडेमध्येही भारताचा जबरदस्त विजय झाला आहे. दक्षिण आफ्रिकेनं ठेवलेल्या ११९ रन्सचं आव्हान भारतानं एक विकेट गमावून पार केलं. दक्षिण आफ्रिकेनं ठेवलेल्या छोट्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताला रोहित शर्माच्या रुपात एक धक्का बसला. १७ बॉल्समध्ये १५ रन्स करून रोहित शर्मा माघारी परतला. मॉर्ने मॉर्कलनं रोहित शर्माची विकेट घेतली. तर शिखर धवन ५१ रन्सवर नाबाद आणि विराट कोहली ४६ रन्सवर नाबाद राहिले. या विजयाबरोबरच भारतानं ६ मॅचच्या वनडे सीरिजमध्ये २-०नं आघाडी घेतली आहे.


या मॅचमध्ये भारतानं टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला. युझवेंद्र चहलच्या स्पिनपुढे दक्षिण आफ्रिकेच्या बॅट्समननी लोटांगण घातलं. युझवेंद्र चहलनं ५, कुलदीप यादवनं ३ तर भुवनेश्वर कुमार-जसप्रीत बुमराहनं प्रत्येकी १-१ विकेट घेतली. दक्षिण आफ्रिकेचा जेपी डुमिनी आणि खाया झोंडोनं सर्वाधिक २५ रन्स केल्या.