मुंबई : आयपीएल संपल्यानंतर आता भारतीय क्रिकेटपटूंच्या लग्न आणि साखरपुड्याचा मोसम सुरु झाला आहे. इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या ए टीममध्ये निवड झालेला कर्नाटकचा क्रिकेटपटू मयंक अग्रवालच्या लग्नानंतर आता आणखी दोन भारतीय क्रिकेटपटूंनी साखरपुडा केला आहे. दिल्लीचा क्रिकेटपटू नीतीश राणानं गर्लफ्रेंड साची मारवाहसोबत साखरपुडा केला आहे. नीतीश राणा आयपीएलमध्ये कोलकात्याकडून खेळला होता. बंगळुरुविरुद्धच्या मॅचमध्ये नीतीशनं दोन बॉलमध्ये विराट आणि एबी डिव्हिलियर्सची विकेट घेतली होती. नीतीशनं विकेट घेतल्यानंतर विराटनं त्याला बॅट गिफ्ट केली होती. नीतीश राणानं आयपीएल २०१८ मध्ये १५ मॅचमध्ये १३१ च्या स्ट्राईक रेटनं ३०४ रन केल्या होत्या.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नीतीश राणा आणि साची मारवाह अनेक दिवसांपासून रिलेशनशीपमध्ये होते. अखेर त्यांनी रविवारी साखरपुडा केला. नीतीशचा दिल्ली रणजी टीममधला सहकारी ध्रुव शोरीनं इन्स्टाग्रामवर साखरपुड्याचे फोटो पोस्ट केले आहेत. साची मारवाह इंटिरियर आर्किटेक्ट आहे.





संदीप शर्माचाही साखरपुडा


आयपीएलमध्ये हैदराबादकडून खेळणाऱ्या संदीप शर्मानंही गर्लफ्रेंड ताशा सात्विकसोबत साखरपुडा केला आहे. ताशा ज्वेलरी डिझायनर आणि ब्लॉगर आहे. ताशासोबत सेल्फी पोस्ट करून संदीपनं त्याच्या साखरपुड्याची घोषणा केली. भारतीय टीममध्ये जागा मिळवण्यासाठी उत्सुक असलेला संदीप शर्मा २०१२ सालच्या अंडर-१९ वर्ल्ड कपमुळे चर्चेत आला. उन्मुक्त चंदच्या नेतृत्वात भारतानं तिसऱ्यांदा अंडर-१९ वर्ल्ड कप जिंकला होता. या वर्ल्ड कपमध्ये संदीपनं सर्वाधिक विकेट घेतल्या होत्या.




मयंक अग्रवालचं लग्न


याच महिन्यामध्ये कर्नाटकचा बॅट्समन मयंक अग्रवालनं गर्लफ्रेंड आशिता सूदसोबत लग्न केलं. भारताचा बॅट्समन के एल राहुल या लग्नाला पोहोचला आणि फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले.