कोलकाता : कोलकाता विरुद्धच्या मॅचमध्ये मुंबईचा ३४ रनने पराभव झाला आहे. मुंबईला कोलकाताने विजयासाठी २३३ रनचे आव्हान दिले होते. यामोबदल्यात मुंबईला ७ विकेट गमावून १९८ रन करता आल्या. मुंबईकडून सर्वाधिक ९१ रन हार्दिक पाडंयाने केल्या. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 



 


कोलकाताने विजयासाठी दिलेल्या २३३ रनचे पाठलाग करायला आलेल्या मुंबईची निराशाजनक सुरुवात झाली. मुंबईने पहिली विकेट ९ रनवर गमावली. क्विंटन डी कॉकला भोपळा देखील फोडता आला नाही. सनील नारायणने त्याला कॅच आऊट केले.


मुंबईला दुसरा विकेट रोहित शर्माच्या रुपात लागला. चेन्नई विरुद्ध ६७ रनची खेळी करणाऱ्या कॅप्टन रोहित शर्माने चाहत्यांची घोर निराशा केली. रोहित शर्माला विशेष काही करता आले नाही. रोहित  १२ रन करुन आऊट झाला.   


यानंतर मुंबईने ठराविक अंतराने आपले विकेट गमावले. मुंबईची ४ बाद ५८ अशी अवस्था झाली होती. सूर्यकुमार यादवला चांगली सुरुवात मिळाली होती. परंतु त्याला या खेळीचे रुपांतर मोठ्या आकड्यात करता आले नाही. सूर्यकुमार यादवने १४ बॉलमध्ये २६ रनची खेळी केली.  


यानंतर मैदानात हार्दिक पांड्या-किरॉन पोलार्ड जोडीने चांगले फटकेबाजी केली. या दोघांमध्ये पार्टनरशीप रंगत असतानाच ही जोडी फिरकीपटू सुनील नारायणने तोडली. पोलार्ड-पांड्या जोडीने ५ व्या विकेटसाठी या दोघांमध्ये ६३ रनची भागीदारी झाली. किरॉ़न पोलार्ड २० रन करुन आऊट झाला. नितीश राणाने पोलार्डची चांगली कॅच घेतली. 


पोलार्डनंतर कृणाल पांड्या मैदानात आला. कृणाल पांड्याने मैदानात आल्या आल्या पहिल्याच बॉलवर सिक्स मारुन आपले मनसुबे दाखवून दिले. एका बाजूला कृणाल सावधपणे खेळत असताना हार्दिक फटकेबाजी करत होता. हार्दिक मैदानात उपस्थित असताना प्रतिस्पर्धी कोलकाताचे काही वेळेसाठी धाबे दणाणले होते. पंरतु मोठे फटके मारण्याच्या नादात पाडंया आपली विकेट गमावून बसला. त्याने ३४ बॉलमध्ये ९१ रनची स्फोटक खेळी केली. यात त्याने ९ सिक्स आणि ६ फोर लगावले. कोलकाता कडून सर्वाधिक सुनील नारायण, हैरी गुर्ने आणि आंद्रे रसेलने प्रत्येकी २ विकेट घेतल्या. तर पियुष चावलाने १ विकेट घेतली.    


याआधी मुंबईने टॉस जिंकून कोलकाताला बॅटिंग करण्यास भाग पाडले. कोलकाताची सुरुवात चांगली झाली. आंद्रे रसेलने मुंबईच्या बॉलर्सची चांगली धुलाई केली. रसेलने ८० रनची खेळी केली. तर शुभमन गिल आणि ख्रिस लिन या दोघांनी प्रत्येकी ७६ आणि ५४ रनची खेळी केली. मुंबईकडून राहुल चहर आणि हार्दिक पांड्याने १-१ विकेट घेतली.


या विजयामुळे कोलकाताचे प्ले-ऑफसाठीचे आव्हान कायम आहे. तर मुंबईला प्ले-ऑफच्या प्रवेशासाठी पुढील मॅचची वाट पाहावी लागणार आहे.