मुंबई :  अतिशय उत्साहात सुरु झालेल्या चेन्नईच्या प्रवासाला यंदाच्या IPL 2020 मध्ये मात्र सूर गवसला नाही. असं असलं तरीही या संघाचं क्रीडारसिकांच्या मनात असणारं स्थान तसुभरही कमी झालेलं नाही. चाहत्यांच्या याच प्रेमाच्या बळावर आयपीएलच्या तेराव्या हंगामातील 49 व्या सामन्यासाठी महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्त्वाखालील चेन्नईचा संघ मैदानात उतरला आणि हरवलेला सूर पुन्हा शोधत संघानं सामना खिशात टाकत कोलकाताला नमवलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोलकाता संघाचं आव्हान स्वीकारत माहीची ही सेना मैदानात आली.  प्रथम फलंदाजी करत चेन्नईच्या संघापुढं कोलकाताच्या संघानं 173 धावांचं लक्ष्य ठेवलं. पहिल्या विकेटसाठी झालेल्या अर्धशतकी भागीदारीमध्ये पुण्याच्या ऋतुराज गायकवाडनं त्याची छाप सोडली. 


एकिकडे संघ कोलमडत असतानाच ऋतुराज मात्र चांगलाच धीरानं विरोधी संघाचा सामना करत होता. अखेरच्या षटकापर्यंत रंगेल्या या सामन्यास रवींद्र जाडेजा, अर्थात सर जाडेजाची फटकेबाजीरी चांगलीच गाजली. 




जाडेजाला मोठी धावसंख्या उभी करता आली नसली तरीही, त्याची फलंदाजी तितकीच वाखाणण्याजोगी होती. कोलकाताच्या लॉकी फर्ग्सुसनच्या गोलंदाजीला फटकेबाजीनं उत्तर देत जाडेजानं सामन्याचं चित्र पालटलं. सामन्यावर चांगली पकड असतानाही खेळाडू बाद झाल्यामुळं चेन्नईच्या विजयाच्या आशा धुसर झाल्या होत्या. पण, अखेर हे आयपीएल आहे... आणि इथं सामना रंगलाच नाही तर मग सारं व्यर्थच. अगदी याच ओळीला साजेसं चित्र सामन्याच अखेरच्या काही मिनिटांमध्ये पाहायला मिळालं. मुख्य म्हणजे चेन्नईच्या विजयाचा मुंबईलाही फायदा झाला आहे. मुंबईच्या नावापुढं आता play off साठी,  क्वालिफाय असे शब्द उमटल्यामुळं या विजयाचा आनंद मुंबईला पाठिंबा देणाऱ्यांच्याही चेहऱ्यावर पाहायला मिळत आहे.