मुंबई : IPL 2020 मध्ये जहीर खान यानं हार्दिक पांड्याच्या खेळाबाबत अत्यंत महत्त्वपूर्ण वक्तव्य केल्याचं पाहायला मिळालं आहे. सध्याच्या घडीला आयपीएलच्या या हंगामात सर्वच  संघांची कामगिरी पाहता तुलनेनं मुंबईच्या संघाकडूनही आणखी चांगल्या खेळाची अपेक्षा केली जात आहे. त्यातच आता, हार्दिक पांड्या हासुद्धा गोलंदाजीसाठी इच्छुक असल्याची महत्त्वाची बाब जहीरनं सर्वांपुढे आणली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हार्दिक गोलंदाजीसाठी इच्छुक असला तरीही संघाच्या व्यवस्थापनाला त्याच्या शारीरिक सुदृढतेकडेही लक्ष देणं तितकंच महत्त्वाचं आहे. मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात हार्दिकवर परदेशात एक शस्त्रक्रिया करण्याच आली होती. ज्यानंतर त्यानं मार्च महिन्यात क्रिकेटमध्ये पुनरागमन केलं. पण, आयपीएलच्या आधीच्या दोन सामन्यांमध्ये त्यानं मुंबईच्या संघासाठी गोलंदाजी केली नव्हती, अशी माहिती जहीरनं दिली. 


हार्दिकच्या गोलंदाजी बाबत जहीर पुढं म्हणाला, 'आम्ही सर्वजण त्याच्या गोलंदाजीकडे नजर टीकवून आहोत आणि तो गोलंदाजी करेल अशी आशा बाळगून आहोत. तो एक असा खेळाडू आहे, जो कोणत्याही संघाचं संतुलन बदलू शकतो आणि हे तोसुद्धा जाणतो. पण, आम्हाला त्याच्या शारीरिक सुदृढतेकडेही लक्ष देणं गरजेचं आहे. फिजिओकडून आम्ही यासाठीचा सल्ला घेतच आहोत'. 


खुद्द हार्दिकलाही गोलंदाजी करण्याची इच्छा असली तरीही सध्याच्या घडीला संयमानं निर्णय घेणं फायद्याचं ठरेल, असं म्हणत खेळाडूचं शरीरही या खेळामध्ये तितकंच महत्त्वाचं असतं ज्याच्या साथीनंच चांगल्या खेळाचं प्रदर्शन करता येतं ही बाब जहीरच्या बोलण्यातून अधोरेखित झाली. 


 


दरम्यान, पंजाबविरोधातील सामन्यात पराभवाचा सामना करणाऱ्या बंगळुरूच्या संघाला मुंबईच्या संघाचं आव्हान असणार आहे. या सामन्यामध्ये बंगळुरूचा संघ वेगवान गोलंदाजीवर जास्त भर देताना दिसण्याची चिन्हं आहेत. तर, मुंबईच्या संघात प्लेइंग इलेव्हनमध्ये एक बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात येणार आहे. आता हा बदल नेमका कोणता असेल हे अवघ्या काही तासांतच उघड होणार आहे. शिवाय या सामन्यामध्ये हार्दिक पांड्याची गोलंदाजी पाहायला मिळते का, हासुद्धा क्रीडारसिकांपुढं उभा राहिलेला एक उत्सुकतेचा प्रश्न आहे.