Virat Kohli vs Gautam Gambhir Fight: आयपीएल 2023 चा (IPL 2023) 16 वा हंगाम दिवसेंदिवस अधिकच रोमांचक होत चालला आहे. पण सोमवारी लखनऊच्या भारतरत्न श्री अटलबिहारी वाजपेयी स्टेडियमचे युद्धभूमीत रुपांतर कधी झालं हे कळलंच नाही. होय युद्धभूमीच. कारण रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा (RCB) माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि लखनऊ सुपर जायंट्सच्या (LSG) संघाच्या कोचिंग टीमचा भाग असलेला गौतम गंभीर (Gautam Gambhir) यांच्यात इतकं कडाक्याचं वाजलं की दोघांमध्ये हाणामारी होतेय की काय असचं वाटत होतं. पण या बाचाबाचीला आता थेट 10 वर्षापूर्वी घडलेल्या प्रसंगासोबत जोडलं जात आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयपीएल 2023 चा 43 वा सामना लखनऊ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यात खेळला गेला. मात्र हा सामना चेसिंगपेक्षा हाय व्होल्टेज ड्राम्यामुळेच जास्त चर्चेत आला आहे. या सामन्यादरम्यान दशकभर शांत असलेला विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यातील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला. , बंगळुरूच्या संघाने लखनऊला त्यांच्याच घरच्या मैदानावर 18 धावांनी पराभूत केले. दिल्लीतून आलेले हे विराट आणि गौतम गंभीर हे मॅचनंतर एकमेकांशी भांडताना दिसले. या दोघांमधली झुंज पाहून क्रिकेट चाहत्यांना 2013 सालचा विराट आणि गंभीरचा वाद नक्कीच आठवला असेल.


अफगाणिस्तानचा वेगवान गोलंदाज नवीन-उल-हक आणि विराट कोहली यांच्यात काही मुद्द्यावरून वाद झाला आणि त्यानंतर गौतम गंभीर आणि विराट कोहली यांच्यात वादाची ठिणगी पडली. सामन्यानंतर हात मिळण्याच्या वेळी हा वाद पेटला. अफगाणिस्तानचा गोलंदाज नवीन-उल-हक विराटला काहीतरी म्हणाला, त्यानंतर दोघांमध्ये वाद सुरू झाला. त्यावेळी हे प्रकरण कसेबसे शांत झाले. काही वेळाने लखनऊचा सलामीवीर काइल मेयर्स विराटसोबत फिरताना कॅमेरात कैद झाला. विराट आणि मेयर्समधील वादही वाढताना दिसत होता. तिथे गौतम गंभीरने एन्ट्री घेतली.


प्रकरण मिटल्यासारखं वाटत असतानाच गौतम गंभीर वेगाने विराटकडे गेला अन् दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झालं.  त्यानंतर केएल राहुल आणि अमित मिश्रा आणि इतरांनी मिळून वाद कसा तरी शांत केला. 



10 वर्षांपूर्वी काय घडलं होतं?


गौतम गंभीर आणि विराट कोहली यांच्यात अनेकदा वाद झाल्याचे पाहायला मिळाले आहे. 2013 मध्ये, जेव्हा गौतम गंभीर केकेआरचा कर्णधार होता आणि विराट आरसीबीचा कर्णधार होता. त्यावेळी सामन्यादरम्यान कोणत्यातरी मुद्द्यावरून दोघांमध्ये बाचाबाची झाली होती. प्रकरण हाणामारीपर्यंत पोहोचले होते. त्यावेळी खेळाडू आणि पंचांनी मध्यस्थी केली, नाहीतर त्या रात्री मैदानावर काय झाले असते माहीत नाही.