IPL Final 2023 GT vs CSK Rained Off: इंडियन प्रिमीअर लिगचा (IPL 2023) अंतिम सामना आज गुजरातमधील अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडणार आहे. हा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि सध्याचे विजेते गुजरात जायंट्सदरम्यान (GT vs CSK Final) खेळवला जाणार आहे. मात्र या सामन्यावर पावसाचं सवाट आहे. याच मैदानावर शुक्रवारी खेळवण्यात आलेल्या मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरातदरम्यानच्या क्वालिफायर-2 सामन्याआधीही पाऊस पडला होता. त्यामुळे सामना अर्धा तास उशीराने सुरु झाला होता. त्यामुळे अंतिम सामन्यादरम्यान किंवा त्याच्या आधीही या ठिकाणी पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र हा सामना पावसामुळे पूर्णपणे रद्द होऊ शकतो का? पाऊस पडला आणि सामनाच झाला नाही तर कोणाला विजयी ठरवलं जाणार? असे अनेक प्रश्न सध्या चाहत्यांना पडले आहेत. याच प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात...


पावसामुळे फायनलचा सामना खेळवण्यातच आला नाही तर कोण जिंकणार यासंदर्भातील नियम काय सांगतात?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

> सामन्याच्या वेळेत पाऊस झाला तर 2 तासांचा अतिरिक्त वेळ दिला जाईल. 


> पाऊस सतत सुरु राहिला तर जास्तीत जास्त उशीरा म्हणजेच अडीच तास पाऊस थांबण्याची वाट पाहिली जाईल. म्हणजेच कितीही उशीर झाला तरी रात्री 10 वाजून 10 मिनिटांपर्यंत सामना खेळण्यासंदर्भातील निर्णय घेतला जाईल. मात्र सामना सुरु होण्याच्या वेळेपासून रात्री 10 नंतरही पाऊस सुरु राहिला तर आज सामना खेवण्याची शक्यता कमी आहे.


> फायनलच्या सामन्यासाठी अतिरिक्त राखीव दिवस म्हणजेच रिझर्व्ह दिवस ठेवण्यात आला आहे. रिझर्व्ह दिवशीही पाऊस असेल तर 2 तासांच्या अतिरिक्त वेळाचा (या यादीतील पहिला) नियम लागू असेल.


> पावसामुळे प्रत्येकी 5 षटकांचा सामना खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला तर कितीही उशीर झाला तरी रात्री 11.56 पर्यंत सामना सुरु करावा लागेल. पंचांना हा सामना 12.50 वाजेपर्यंत संपवावा लागणार आहे. पाच षटकांचा सामना घ्यायचा की नाही याचा अंतिम निर्णय 12.26 पर्यंत घेता येईल.


> फायनलमध्ये किमान 1 चेंडू टाकण्यात आला असेल तर सामना रिझर्व्ह डेला खेळवला जाईल. ज्या ठिकाणी सामना थांबवण्यात आला. तिथून पुढे सामना सुरु केला जाईल. 


> रिझर्व्ह दिवसाचे 3 तास 20 मिनिटं आणि अतिरिक्त दोन तास म्हणजेच 5 तास 20 मिनिटांचा वेळ आहे.


> फायनलमध्ये सुपरओव्हरचा वापर केला जाईल का? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर रिझर्व्ह असलेल्या दिवशीही पाऊस पडला आणि त्या दिवसाच्या अतिरिक्त 2 तासांमध्येही सामना खेळवला गेला नसेल तर सामन्याचा निकाल सुपरओव्हरच्या माध्यमातून लावला जाईल. 


> ही सुपरओव्हर खेळवायची की नाही याचा सर्वात उशिरा निर्णय घ्यायचा ठरला तरी तो रिझर्व्ह दिवशी रात्री 1.20 मिनिटांपर्यंत (मंगळवारी मध्यरात्रीनंतर 1.20 मिनिटांपर्यंत) घ्यावा लागेल. हा निर्णय मैदानाची अवस्था, पीचची स्थिती यावर अवलंबून असेल.


> मात्र सुपरओव्हर खेळवता आली नाही तर 70 सामन्यांचा विचार करुन पॉइण्ट्स टेबलमध्ये अव्वल स्थानी असलेल्या संघाला विजेता घोषित केलं जाईल. या वेळी प्लेऑफ्समध्ये पहिलं अंतिम सामन्यात कोण पोहचलं वगैरे यासारख्या गोष्टी गृहित धरल्या जाणार नाहीत.


> म्हणजेच 2 दिवस भरपूर पाऊस पडला आणि अंतिम सामन्यात एकही चेंडू खेळवण्यात आला नाही तर मैदानात न उतरताच गुजरातचा संघ दुसऱ्यांदा विजेता ठरेल. कारण गुजरातच्या संघाने साखळी फेरीत 14 पैकी 10 सामने जिंकले आहेत. तर चेन्नईच्या संघाने 14 पैकी 8 सामने जिंकले आहेत. त्यामुळे 20 पॉइण्ट्सहीत गुजरातला विजेता ठरवलं जाईल.