मुंबई : आयपीएल 2022 मध्ये मुंबई इंडियन्सची सुरुवात खूपच खराब झाली आहे. मुंबई इंडियन्स या सिझनचे 4 सामने खेळली आहे, परंतु यामध्ये एकदाही मुंबईला आपल्या नावे विजय नोंदवता आलेला नाही. ज्यामुळे आयपीएल 2022 मध्ये मुंबई संघाला सलग चार सामन्यांत पराभवाला सामोरे जावे लागले होते. मुंबई इंडियन्सच्या खराब खेळानंतर या टीमचा स्टार खेळाडू आणि बॉलर जसप्रीत बुमराहने आपल्या टीमबद्दल वक्तव्य केलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह म्हणाला की, 'आम्ही प्लेइंग इलेव्हन (Playing 11) शोधण्यासाठी धडपडत नाही, पण टी-20 सामने हे नेहमीच विकेटनुसार बदलतात. त्यामुळे मला खात्री आहे की, एकदा का आम्हाला यश मिळाले, तर आम्ही वेगाने पुढे जाऊ.'


पुढे जसप्रीत बुमराह म्हणाला, 'आम्ही जे नियोजन केले त्यात आम्हाला यश आले नाही, तर भूतकाळात जे घडले तो इतिहास आहे. आतापर्यंत योजनांनुसार गोष्टी झाल्या नाहीत, पण आम्ही लढू. आम्ही आव्हानावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करत आहोत आणि पुढील सामन्यावर लक्ष केंद्रित करत आहोत.'


नवीन टीमबद्दल काय म्हणाला बुमराह


जसप्रीत बुमराह म्हणाला, 'प्रत्येक संघ कधीतरी वाईट टप्प्यातून जातो, स्पर्धेत दोन नवीन संघ आहेत आणि नवीन खेळाडू संघाला समजून घेत आहेत आणि एकदा विजय मिळवला की, संघाची गती परत येईल. आम्हा सर्वांना खेळ आवडतो, म्हणून आम्ही खेळतो. प्रत्येक वर्षी नवीन चॅलेंज समेर येत असतं आणि यायावर्षी विकेट्स फलंदाजांना मदत करत आहेत. परंतु यावर देखील आम्ही तोडगा काढण्याचा प्रयत्न करत आहोत.


पाच वेळा विजेतेपद पटकावले


रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने पाच वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे. ही टीम आयपीएलमधील सर्वात यशस्वी टीमपैकी एक आहे. परंतु मुंबईचा एकही गोलंदाज आणि फलंदाज आयपीएल 2022 मध्ये चांगली कामगिरी करू शकलेला नाहीत. आता पाहूयात पुढच्या सामन्यात टीम काही नवीन चमत्कार करुन दाखवते का...