मुंबई : टीम इंडियाच्या टी 20 वर्ल्ड कप 2021 मधील ( T 20 World Cup ) मोहिमेची सुरुवात 24 ऑक्टोबरपासून होणार आहे. टीम इंडिया (Team India) पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान (Pakistan) विरुद्ध भिडणार आहे. या सामन्यासाठी खेळाडूंसह क्रिकेट चाहतेही उत्सूक आहेत. या संपूर्ण स्पर्धेत विराट कोहली (Virat Kohli) टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे. पाकिस्तान विरुद्ध विराटचे धमाकेदार रेकॉर्ड्स आहेत. विराटने नेहमीच टीम इंडियाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. विशेष म्हणजे पाकिस्तानच्या गोलंदाजांना विराटला कधीही टी 20 वर्ल्ड कपमध्ये आऊट करणं जमलेलं नाही. (Pakistan has never been able to dismiss Virat Kohli in the T20 World Cup)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टी 20 वर्ल्ड कप 2012 


 विराट पाकिस्तान विरुद्ध टी 20 वर्ल्ड कपमध्ये 2012 साली पहिल्यांदा खेळला होता. हा सामना कोलंबोत पार पडला होता. पाकिस्तानने सर्वबाद 128 धावा केल्या होत्या. तर टीम इंडियाकडून विराटने 61 चेंडूत 78 धावांची नाबाद खेळी केली होती. विराटच्या या खेळीमुळे टीम इंडियाने हा सामना  17 व्या ओव्हरमध्ये जिंकला होता.      
  
टी 20 वर्ल्ड कप 2014 


विराट पाकिस्तान विरुद्ध टी 20 वर्ल्ड कपमध्ये 2014 साली दुसऱ्यांदा खेळला होता. ही मॅच ढाक्यात खेळवण्यात आली. या सामन्यात पाकिस्तानने निर्धारित 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 130 धावा केल्या होत्या. तर विराटने या सामन्यात 32 चेंडूत नाबाद 36 धावा करुन टीम इंडियाचा विजय सोपा करुन दिला होता.


टी 20 वर्ल्ड कप 2016 


विराट कोहली पाकिस्तान विरुद्ध अखेरच्या वेळेस 2016 मध्ये खेळला होता. हा सामना कोलकात्यात पार पडला होता. हा सामना 18 ओव्हर्सचा होता. पाकिस्तानने 5 विकेट्स गमावून 118 धावा केल्या होत्या. या सामन्यात विराटने 37 चेंडूत नाबाद 55 धावांची अर्धशतकी खेळी साकारली होती. या खेळीच्या जोरावर टीम इंडियाचा 13 चेंडूआधी विजय झाला होता. 


या वरील आकडेवारीवरुन विराटची पाकिस्तान विरुद्धची आकडेवारी लक्षात आलीच असेल. त्यामुळे टीम इंडियाच्या चाहत्यांना या सामन्यातही विराटकडून अशाच प्रकारच्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे. त्यामुळे विराट पाकिस्तान विरुद्ध नाबाद राहण्याची  परंपरा कायम राखणार की पाकिस्तानचे गोलंदाज त्याला बाद करणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.