मुंबई : पाकिस्तानचा आणखी एक खेळाडू त्याच्या खळबळजनक वक्तव्यामुळे चर्चेत आला आहे. पाकिस्तानचा माजी ऑलराऊंडर अब्दुल रझाक याने आपलं लग्नानंतर पाच ते सहा महिलांशी अफेयर होतं, असा खुलासा केला आहे. यातलं एक अफेयर दीड वर्ष चाललं असल्याचं रझाकने सांगितलं. एका टीव्ही शोमध्ये बोलत असताना अब्दुल रझाकने हे वक्तव्य केलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'पाच-सहा वेळा प्रेमात पडलो. प्रेमात पडण्याची व्हॅलिडिटीही असते आणि एक्सपायरीही. वर्ष-दीड वर्षामध्ये सगळं संपून जातं. जेव्हा सुरु असतं तेव्हा चांगलं वाटतं, पण जेव्हा निकाल लागतो, तेव्हा अजिबात चांगलं वाटत नाही,' असं रझाक म्हणाला.



या टीव्ही शोच्या सूत्रधाराने रझाकला अफेयर लग्नाआधी होतं का नंतर? असा प्रश्न विचारला. तेव्हा रझाकने हे संबंध लग्नानंतरचे असल्याचं सांगितलं. रझाकच्या या वक्तव्यांना हार्दिक पांड्याने कॉफी विथ करणमध्ये केलेल्या वक्तव्यांशी जोडलं जात आहे. हार्दिक पांड्याने कॉफी विथ करण या शोमध्ये केलेल्या वक्तव्यानंतर मोठा वाद झाला होता. यानंतर पांड्याचं निलंबनही करण्यात आलं होतं.


हार्दिक पांड्याला माझ्याकडे ट्रेनिंगसाठी पाठवा, त्याला जगातला सर्वोत्तम ऑलराऊंडर बनवतो, असं ट्विट वर्ल्ड कपदरम्यान अब्दुल रझाकने केलं होतं. त्या ट्विटवरूनही आता अब्दुल रझाकला ट्रोल करण्यात येत आहे.


१९९९ साली अब्दुल रझाकने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. २०१३ पर्यंत रझाक आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला. रझाकने ४६ टेस्टमध्ये ३ शतकं आणि ७ अर्धशतकांसह १९४६ रन केले आणि १०० विकेट घेतल्या. तर २६५ वनडेमध्ये त्याने ३ शतकं २३ अर्धशतकं करून ५.०८० रन केले आणि २६९ विकेट घेतल्या. ३२ टी-२०मध्ये रझाकने ३९३ रन केले आणि २० विकेट घेतल्या.