नवी दिल्ली : लागोपाठ क्रिकेट आणि व्यस्त दौ-यांमुळे वैतागलेला टीम इंडियचा कर्णधार विराट कोहली याने या मुद्द्यावर नाराजी व्यक्त केली होती. या मुद्द्यावर त्याला सौरव गांगुलीसारख्या माजी खेळाडूचंही समर्थन मिळालं होतं. त्यामुळे कदाचित विराट कोहलीला श्रीलंके विरूद्धच्या टेस्ट सीरिजमधून विश्रांती देण्यात आल्याचं बोललं जात आहे. त्याच्याजागी रोहित शर्माकडे टीमचं नेतृत्व दिलं गेलंय. आता विराटच्या संतापामुळे बीसीसीआयचं डोकं ठिकाण्यावर आल्याचं दिसत आहे.  


विराटच्या संतापाचं समर्थन


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या काही महिन्यांपासून सतत क्रिकेट खेळत असलेल्या टीम इंडियाचे सामने आता कमी होण्याची शक्यता आहे. याचे संकेत प्रशासक समिती प्रमुख विनोद राय यांनी दिलीये. 


खेळाडूंच्या हिताचा विचार


सीओए प्रमुख विनोद रायने व्यस्त कार्यक्रमावर कर्णधार विराट कोहलीच्या वक्तव्याचं समर्थन केलं. ते म्हणाले की, या मुद्द्यावर खेळाडूंच्या हिताचा विचार केला जाईल. टीम इंडिया २४ डिसेंबरला श्रीलंके विरूद्धची सीरिज खेळेल. नंतर २८ डिसेंबरला दक्षिण आफ्रिकेसाठी टीम इंडिया रवाना होईल. त्यांना ३० डिसेंबरला सामने सुरू होण्याआधी एक अभ्यास सामना खेळावा लागेल. 


पैशांसाठी खेळाडूंचा बळी नाही


कोहलीने तक्रार केली होती की, व्यस्त कार्यक्रमामुळे त्याला दक्षिण आफ्रिकेच्या महत्वपूर्ण दौ-याच्या तयारीसाठी पूर्ण वेळ मिळाला नाही. यावर विनोद राय म्हणाले की, ‘मी विराट्च्या वक्तव्यावर सहमत आहे. असे होत आहे. आता आम्ही पैशांसाठी आमच्य किंमती खेळाडूंचा बळी देणार नाही. आम्ही पुढील वर्षी याकडे लक्ष देऊ की, तिन्ही प्रकारांमध्ये संतुलन असावं’.


खेळाडूंसोबत करणार चर्चा


ते म्हणाले की, दिल्ली टेस्ट सामन्या दरम्यान खेळाडू आपलं प्रेझेंटेशन देतील. तेव्हाच त्यांच्या या मुद्द्यावर त्यांचे सल्लेही घेतले जातील. आम्ही टीमसोबत भविष्यातील दौ-यांबाबतही बोलू. ज्याप्रकारचं शेड्युल आहे ते पाहता सामन्यांची संख्या कमी करणे हाच एकमेव उपाय आहे. २०१९ पासून ते २०२३ पर्यंतचा कार्यक्रम तयार केला जात आहे. त्यात असं होऊ शकतं की, क्रिकेट खेळण्याचे दिवस कमी केले जाऊ शकतात. सामन्यांची संख्या १४० वरून ८० केली जाऊ शकते.