Rishabh Pant Accident : भारताचा स्टार फलंदाज आणि विकेटकीपर ऋषभ पंतसाठी शुक्रवारची सकाळ ही धक्कादायक ठरली आहे. घरी परतत असताना ऋषभ पंतच्या गाडीला (Rishabh Pant Car) हरिद्वारमध्ये दिल्ली-देहरादून हायवेवर गंभीर अपघात झाला. या अपघातानंतर पंतच्या गाडीने पेट घेतला. वेगात असलेल्या पंतच्या गाडीने दुभाजकाला धडक दिल्यानंतर ती उलटल्याचे सीसीटीव्ही फुटेजमधून समोर आले आहे. सुदैवाने या अपघातात पंत बचावला आहे. मात्र त्याला गंभीर अशा जखमा झाल्या आहेत. त्यामुळे आता यापुढे पंत मैदानावर असणार की नाही अशा चर्चा सुरु झाल्या आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऋषभ पंतच्या अपघातानंतर त्याचे चाहते चिंतेत आले आहेत. पंतवर सध्या देहरादून येथे उपचार सुरु आहेत. मात्र डॉक्टरांनी पंतच्या प्रकृतीबाबत दिलेल्या माहितीमुळे तो यापुढे मैदानात उतरणार की नाही याबाबत शंका निर्माण झाली आहे. ऋषभ पंतला गुढघ्याच्या दुखापतीमुळे श्रीलंकेसोबत होणाऱ्या टी-20 मालिकेसाठी विश्रांती देण्यात आलीय. त्यातच आता झालेल्या गंभीर अपघातामुळे चिंता आणखी वाढली आहे.


माध्यमांच्या वृत्तानुसार ऋषभ पंतला गंभीर दुखापत झाली आहे. त्याच्या कपाळावर आणि गुडघ्याला झालेली दुखापत गंभीर आहे. सुरुवातीच्या एक्स-रेमध्ये शरीरावर फ्रॅक्चर किंवा भाजल्यासारखे काही आढळले नाही. मात्र एमआरआय आणि इतर तपासण्यांनंतरच सर्व काही स्पष्ट होईल, असे पंतवर उपचार करणाऱ्या डॉ. सुशील नागर यांनी सांगितले. तर ऋषभ पंतच्या कपाळावर दोन जखमा झाल्या आहेत. त्यातील एक डाव्या डोळ्याच्या वर आहे. यासोबतच त्याच्या गुडघ्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्यामुळे ऋषभ पंतला यातून बरे होण्यासाठी बराच वेळ लागू शकतो, असे म्हटले जात आहे.


डॉ. सुशील नागर यांनी सांगितले की, "पंतला डोक्याला आणि गुढघ्याला झालेल्या दुखापतीमुळे पुढील चाचण्या करण्यात येणार आहेत. जेव्हा त्याला  हॉस्पिटलमध्ये आणले तेव्हा तो पूर्णपणे शुद्धीत होता आणि मीही त्याच्याशी बोललो. त्याच्या डोक्याला दुखापत झाली आहे, पण मी टाके घातले नाहीत. एक्सरेमध्ये त्याचे कोणतेही हाड तुटलेले नाही. पण उजव्या गुडघ्याला दुखापत झाली आहे."  तर दुसरीकडे लिगामेंटची दुखापत बरी होण्यासाठी दोन ते सहा महिने लागतात. तसेच पंतच्या पाठीवर मोठी जखम झाली आहे. ती आगीमुळे झालेली जखम नाही आणि गंभीरही नाही, असेही डॉक्टर म्हणाले.


पंतच्या अपघातावर बीसीसीआयने काय म्हटलंय?



ऋषभ पंतच्या अपघाताबाबत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) सचिव जय शाह यांनी निवेदन जारी करत प्रतिक्रिया दिली आहे. अपघातानंतर ऋषभ पंतला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बीसीसीआय त्याचे कुटुंब आणि रुग्णालयाच्या संपर्कात आहे आणि त्याला सर्वोत्तम उपचार देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असे बीसीसीआयने आपल्या निवेदनात म्हटले आहे.