मुंबई : टीम इंडियाचं कर्णधारपद रोहित शर्माकडे आहे. द्रविड आणि रोहितने टीम इंडियाचा विजयरथ सुरू ठेवला आहे. सिक्सर किंग आणि माजी क्रिकेटर युवराज सिंगने उपकर्णधारपदाबाबत मोठं विधान केलं आहे. टीम इंडियाचं उपकर्णधारपद युवा खेळाडूच्या हाती देण्याची त्याने निवड समितीकडे मागणी केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

युवराज सिंगच्या मते ऋषभ पंतकडे टीम इंडियाचं उपकर्णधारपद द्यायला हवं. कसोटीची उपकर्णधारपद पंतला देण्याची मागणी केली आहे. टीम इंडियाचा कसोटीचा पुढचा कर्णधार पंत अशू शकतो. त्यामुळे त्याची तयारी आतापासून व्हायला हवी. त्यासाठी उपकर्णधारपद त्याच्याकडे द्यायला हवं. 


'विकेटकीपरकडे मैदानातल्या घडामोडींवर विचार करण्याचं कौशल्य असतं. त्यामुळे तो खूप चांगल्यापद्धतीनं ही गोष्ट सांभाळू शकतो जशी महेंद्रसिंह धोनीनं सांभाळली होती'. 


'भविष्याचा विचार करता निवड समितीनं पंतकडे उपकर्णधारपदाची जबाबादारी द्यायला हवी. तो विकेटकीपर असल्याने मैदानात त्याचं लक्ष सगळीकडे असतं. शिवाय त्याचं कौशल्य, विचार करण्याची क्षमता पाहता तो ही जबाबदारी उत्तम सांभाळू शकतो असा विश्वास युवीने व्यक्त केला. भविष्याचा विचार करता आतापासून यासाठी त्याची तयारी करायला हवी' असंही युवी म्हणाला. 


'विराट कोहलीला जेव्हा कर्णधारपद दिलं तेव्हा तो परिपक्त नव्हता. पण वेळेनुसार तोही तयार झाला. ऋषभ पंतकडून एक वर्ष अपेक्षा करू नका. पण पुढे तो कामगिरी उत्तम करेल याच्यावर विश्वास ठेवा. तो तुमच्या अपेक्षांना पात्र उतरल्याचं दिसेल' असं युवीने म्हटलं आहे. 


24 वर्षांच्या पंतला उपकर्णधारपद देण्याचा युवीचा निर्णय एका दृष्टीनं विचार करता योग्यही वाटतो. 2018 नंतर पंतने आपल्या कामगिरीत खेळात मोठा बदल आणला त्याचा फायदा त्याला मैदानावर झाल्याचं पाहायला मिळालं.