Prithvi Shaw : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉर्डर-गावस्कर चषकासाठी (Border-Gavaskar Trophy 2023) संघ निवडीसंदर्भात चर्चा सुरु असतानाच पृथ्वी शॉने (Prithvi Shaw)आपल्या कामगिरीने निवड समितीचं लक्ष वेधलं आहे. रणजी ट्रॉफीच्या 2022-2023 (Ranji Trophy) आसामविरुद्धच्या सामन्यामध्ये पृथ्वी शॉने त्रिशकती खेळी केली आहे. मुंबईकडून सलामीवीर म्हणून खेळणाऱ्याने पृथ्वीच्या या कामगिरीची सध्या क्रिकेट वर्तुळामध्ये जोरदार चर्चा सुरु आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पृथ्वी शॉने पहिल्याच दिवशी आपल्या प्रथम श्रेणी क्रिकेटच्या कारकिर्दीमधील दुसरे द्विशतक झळकावलं. त्यानंतर त्याने त्रिशतक झळकावलं. 400 धावांपासून 21 धावा दूर असतानाच शॉ 379 धावांवर बाद झाला. मागील एका वर्षापासून पृथ्वी शॉला भारतीय संघात संधी मिळालेली नाही. मात्र या त्रिशतकाच्या जोरावर आता पृथ्वी पुनरागमन करण्यास सज्ज असल्याचं सांगितलं जात आहे.


मागील वर्षीच पृथ्वी शॉला संघामध्ये संधी मिळेल अशी शक्यता व्यक्त केली जात होती. त्याचवेळी न्यूझीलंड आणि बांगलादेशविरुद्धच्या मालिकेतून पृथ्वीला डावललं गेलं होतं. त्यानंतर त्याने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन साई बाबांचा फोटो शेअर केला होता. मात्र आता या फोटोसंदर्भात पृथ्वी शॉने स्पष्टीकरण दिलं आहे. 19 वर्षांखालील संघाला विश्वचषक जिंकवून देणाऱ्या पृथ्वीने पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना, "मला वाटतं की, ती पोस्ट फक्त ते (साई बाबा) माझ्यावर लक्ष ठेऊन आहेत की नाही याबद्दल होती. ती पोस्ट खास कोणाला उद्देशून केलेली नव्हती. ती फार खासगी पद्धतीची पोस्ट होती," अशी प्रतिक्रिया नोंदवली.



सोशल मीडियावरील ट्रोलिंगचा आपल्यावर फारसा परिणाम होत नाही असंही पृथ्वी शॉने सांगितलं. "मी सोशल मीडिया वापरतो पण माझ्या अकाऊंटवरील सर्व पोस्ट माझ्या मॅनेजरकडून केल्या जातात. तो मॅनेजरच माझ्या सोशल मीडियावरील स्टोरी आणि पोस्ट मॅनेज करतो. मी खरोखर तिथं काय चाललं आहे हे पाहत नाही. मी या सर्व गोष्टींपासून स्वत:ला दूर ठेवतो. मी जर माझ्या स्तरावर योग्य पद्धतीने काम करत असेल तर असे (यशस्वी) दिवस पुन्हा पुन्हा नक्कीच येतील," असा विश्वास पृथ्वी शॉने व्यक्त केला.