तिरुअनंतपुरम : भारताचा माजी क्रिकेटपटू एस.श्रीसंतला केरळ उच्च न्यायालयानं दिलासा दिला आहे. स्पॉट फिक्सिंग प्रकरणी बीसीसीआयनं श्रीसंतवर घातलेली आजीवन बंदी उच्च न्यायालयानं उठवली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयपीएलच्या सहाव्या सिझनवेळी २०१३ स्पॉट फिक्सिंगच्या आरोपावरून श्रीसंतवर बीसीसीआयनं बंदी घातली होती. १६ मे २०१३ साली श्रीसंतबरोबरच राजस्थान रॉयल्सच्या अजित चंडीला आणि अंकित चव्हाण यांना अटक करण्यात आली होती.


दिल्ली पोलिसांनी दाखल केलेल्या चार्जशिटमध्ये या खेळाडूंसोबतच आणखी ३९ जणांना आरोपी बनवण्यात आलं. या सगळ्यांनी फक्त सट्टेबाजी नाही तर स्पॉट फिक्सिंगही केल्याचा दावा दिल्लीचे माजी पोलीस कमिशनर नीरज कुमार यांनी केला होता. यानंतर १० जून २०१३ला श्रीसंत, चंडीला आणि चव्हाणला जामीन देण्यात आला.


२५ जून २०१५साली पटियाला हाऊस कोर्टानं ठोस पुरावे नसल्यामुळे या तिघांचीही मुक्तता केली. तरीही बीसीसीआयनं श्रीसंतवरची बंदी कायम ठेवली. यानंतर श्रीसंतनं उच्च न्यायालयात धाव घेतली.