मुंबई : टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेसाठी (T20 World Cup) मोजकेच दिवस शिल्लक आहेत. टी 20 वर्ल्ड कपला 17 ऑक्टोबरपासून यूएईमध्ये सुरुवात होत आहे. या मोठ्या स्पर्धेआधी टीम इंडियासाठी (Team India) वाईट बातमी आहे. टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या (Hardik Pandya) हा आऊट ऑफ फॉर्म आहे सोबतच तो दुखापतीतून सावरलेला नाही. त्यामुळे टीम इंडियासाठी हा मोठा झटका ठरू शकतो. (T20 World cup 2021 team india all rounder player hardik pandya likely be did not fit)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हार्दिकमध्ये कोणत्याही क्षणी सामना एकहाती फिरवण्याची क्षमता आहे. मात्र या खेळाडूचं टी 20 वर्ल्ड कप खेळण्याबाबत साशंकताच आहे. यामुळे टीम इंडियाच्या डोकेदुखीत वाढ झाली आहे.  


या वर्ल्ड कपमध्ये हार्दिक टीम इंडियासाठी मॅचविनर खेळाडू ठरु शकतो. मोठ्या स्पर्धांमध्ये प्रत्येक संघाला एक असा अष्टपैलू खेळाडू हवा असतो, जो आपल्या संघाला निर्णायक क्षणी बॅटिंग आणि बोलिंगने सामना जिंकून देऊ शकतो. हीच क्षमता हार्दिकमध्ये आहे. 


यूएईमध्ये आठवड्याआधी आयपीएलच्या 14 व्या मोसमातील दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली. मुंबईने या दुसऱ्या टप्प्यात आतापर्यंत 3 सामने खेळले. यापैकी पहिल्या 2 सामन्यात हार्दिक खेळू शकला नाही. बंगळुरु विरुद्ध रविवारी 26 सप्टेंबरला झालेल्या सामन्यात हार्दिकला संधी मिळाली. मात्र त्याने बॉलिंग केली नाही. तसेच बॅटिंग करताना केवळ 3 धावा करुन तंबूत परतला.  


वर्ल्ड कपमध्ये खेळण्याबाबत साशंकता 


हार्दिक आयपीएलच्या उर्वरित सामन्यांमध्ये तरी बोलिंग करणार की नाही, याबाबतही शंकाच आहे. हार्दिक गेल्या अनेक महिन्यांपासून बोलिंग करत नाहीये. हार्दिक पाठीच्या खालच्या भागात असलेल्या दुखापतीतून सावरलेला आहे. मात्र त्याला स्वत:ला मैदानात फिट असल्याचं सिद्ध करावं लागणार आहे. 


हार्दिकने गेल्या वर्षभरात फार कमी वेळेस बोलिंग केली आहे. तसेच हार्दिकला त्याच्या लौकीकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. त्यानंतही निवड समितीने त्याची टी 20 वर्ल्ड कपसाठी निवड केली आहे. कारण त्याच्यात असलेली एकहाती सामना फिरवण्याची क्षमता.   


...तर हार्दिकऐवजी कोणाला संधी? 


टी 20 वर्ल्ड कपसाठी हार्दिक दुर्देवाने अनफीट ठरल्यास टीम इंडियासाठी हा मोठा धक्का असेल. मात्र हार्दिकच्या जागेवर अष्टपैलू खेळाडू म्हणून शार्दूल ठाकूरला फायदा होऊ शकतो. शार्दूलमध्ये बोलिंगसह बॅटिंग करण्याचे कौशल्य आहे. त्याने त्याची उपयुकत्ता वेळोवेळेस सिद्ध केली आहे. त्यामुळे हार्दिकची दुखापत ही शार्दुलच्या पथ्यावर पडू शकते. 


शार्दुलची टी 20 वर्ल्ड कपमध्ये राखीव खेळाडू म्हणून निवड करण्यात आली आहे. त्यामुळे आता टी 20 वर्ल्ड कप आधी हार्दिक फिट होतो की नाही, याकडे सर्व भारतीय क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.