केपटाऊन : दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवर तब्बल २५ वर्षानंतर इतिहास रचण्याचे स्वप्न पाहणाऱ्या टीम इंडियाच्या अपेक्षांना पहिल्याच सामन्यात धक्का बसला. तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताला आफ्रिकेकडून ७२ धावांनी पराभव सहन करावा लागला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आफ्रिका तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडीवर आहे. मालिकेत पुनरागमन करणं भारतीय संघासाठी नक्कीच आव्हानात्मक आहे. केपटाऊनमध्ये भारताकडे विजयाची संधी होती. मात्र फलंदाजांच्या हाराकिरीमुळे भारताने ही संधी गमावली आणि पहिल्याच सामन्यात हार पत्करावी लागली.


या पराभवानंतर टीम इंडियाच्या कामगिरीवर सवाल उपस्थित होऊ लागलेत. विराट सेना आफ्रिकेत गोलंदाजांना अनुकूल असलेल्या परिस्थितीत खेळण्यास पूर्णपणे तयार होती का? 


सरावापेक्षा जास्त झाली शॉपिंग


आफ्रिकेतील या कसोटी मालिकेआधी भारतीय संघाकडे दोन दिवसीय सराव सत्र खेळण्याची संधी होती. मात्र ते सत्र रद्द करण्यात आले. भारतीय टीम मॅनेजमेंटच्या मते सराव सत्राच्या ऐवजी नेट सराव भारतीय संघाला फायदेशीर ठरेल. मात्र कसोटी मालिकेआधी भारतीय खेळाडू सरावाव्यतिरिक्त शॉपिंग आणि फिरण्यामुळेच अधिक चर्चेत राहिले. 


०-१ ने पिछाडीवर राहिल्यानंतर एकदाच जिंकलाय पाहुणा संघ


दक्षिण आफ्रिका दौऱ्यात यापूर्वी १-० अशा पिछाडीवर राहिल्यानंतर भारतीय संघाला एकदाच यश मिळालेय. १९२२-२३मध्ये इंग्लंडच्या संघाने पहिला सामना हरल्यानंतर ५ सामन्यांची मालिका २-१ अशी जिंकली होती. त्यामुळे भारत हा कित्ता गिरवणार का हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे.