Javed Akhtar : ही व्यथा आहे एका सच्चा भारतीयाची... आपल्या देशावर आणि शहरावर निस्सीम प्रेम करणाऱ्या जबाबदार मुंबईकराची... हा सच्चा हिंदुस्थानी म्हणजे ख्यातनाम गीतकार जावेद अख्तर... पाकिस्तानात जाऊन त्यांनी पाकिस्तानचीच बोलती बंद केली... 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लाहोरमध्ये आयोजित फैझ फेस्टीव्हलमध्ये ते सहभागी झाले होते. यावेळी मुंबईवरच्या 26/11च्या हल्ल्याच्या जखमेवरची खपली निघाली... मुंबईवर हल्ला करणारे अजूनही तुमच्या देशात खुलेआम फिरतायत, अशा शब्दांत त्यांनी पाकिस्तानलाच खडसावलं...


जावेद अख्तर यांनी फैज फेस्टिव्हल 2023 मध्ये म्हटलं की "आम्ही नुसरत आणि मेहंदी हसन यांचे मोठमोठे कार्यक्रम आयोजित केले. पण तुमच्या देशात लता मंगेशकर यांचा कोणताही मोठा कार्यक्रम झाला नाही. आता आपण एकमेकांवर आरोप करुन काही साध्य होणार नाही. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे सध्या जे वातावरणं गरम आहे ते कमी झालं पाहिजे. 



ते पुढे म्हणाले, आम्ही तर मुंबईचे लोक आहोत. आमच्या शहरावर कशाप्रकारे हल्ला झाला हे आम्ही पाहिलं आहे. ते लोक नॉर्व किंवा इजिप्तवरुन तर आले नव्हते. ते लोक आताही तुमच्या देशात फिरत आहेत. त्यामुळे जर एखाद्या भारतीयाच्या मनात याची तक्रार असेल, तर तुम्हाला वाईट वाटण्याचं काही कारण नाही".


नुसरत फतेह अली खान आणि मेहदी हसन यांच्यासारख्या पाकिस्तानी कलाकारांचं भारतात आपुलकीनं स्वागत झालं.. मात्र लता मंगेशकरांचा एकही कार्यक्रम कधी पाकिस्तानात आयोजित करण्यात आला नाही, अशी खंतही अख्तर यांनी यावेळी बोलून दाखवली.


विशेष म्हणजे जावेद अख्तर पाकिस्तानच्या भूमीवरून पाकिस्तानवरच सर्जिकल स्ट्राईक करत असताना, पाकिस्तानी रसिक टाळ्या वाजवून त्यांना दाद देत होते. राजकारण असो, नाहीतर कला, जेव्हा देशप्रेमाचा मुद्दा असतो, तेव्हा तो असाच ठणकावून सांगितला पाहिजे. जावेद अख्तर यांचं हे गदर काबीले तारीफच आहे.