नवी दिल्ली : पाकिस्तानात लपलेले मोस्ट वॉन्टेड दहशतवादी पाकने भारताला सोपवावे, तरच भारत-पाकिस्तान संबंध सुधारतील असा इशारा भारतानं पाकिस्तानला दिला आहे. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी हा इशारा दिला आहे. दाऊद इब्राहिमसारखा अपराधी जोपर्यंत भारताच्या ताब्यात देणार नाही, तोपर्यंत संबंध सुधारणार नसल्याचंही ते म्हणाले. एका परदेशी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीदरम्यान जयशंकर यांनी हे वक्तव्य केलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी म्हटलं की, पाकिस्तानने दहशतवादाचा उद्योग विकसित केला आहे. भारतावर हल्ल्यासाठी ते दहशतवादी पाठवतात. मग चर्चा कशी शक्य आहे.


काश्मीरबाबत विचारलं असताना, एस जयशंकर यांनी म्हटलं की, 'काश्मीर जगापासून वेगळा झाला असं नाही म्हणता येणार. आम्ही ५ ऑगस्टला घोषणा केली होती. या निर्णयाच्या विरोधात फुटीरतावादी लोकं हिंसा आणि अशांती पसरवण्याचा प्रयत्न करु शकत होते. त्यामुळे खबरदारी म्हणून पाऊलं उचलली गेली होती. पण हळूहळू बंदी मागे घेतली गेली आणि आता स्थिती सामान्य आहे. फोनसेवा सुरु झाल्या आहेत. दुकानं उघडली आहेत. व्यापार वाढत आहे.'


कोणता देश आपल्या शेजारील राष्ट्रासोबत चर्चा करेल जो देश त्यांच्याविरोधात दहशतवादाचा अभ्यास करतो. असं देखील एस जयशंकर यांनी म्हटलं आहे.