नवी दिल्ली : पुलवामा हल्ल्यानंतर भारताने पहिला मोठा राजनैतिक विजय मिळवला आहे. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेने पुलवामा हल्ल्याचा एकमुखाने जोरदार निषेध केला. एवढेच नाही तर जैश - ए - मोहम्मद या दहशतवादी संघटनेने हा हल्ला घडवून आणल्याचेही म्हटले आहे. सुरक्षा परिषदेत चीनही कायमस्वरूपी सदस्य आहे. अझर मसूदला दहशतवादी घोषीत कऱण्याविरोधात चीन सातत्याने नकाराधिकार वापरत होता. त्या पार्श्वभूमीवर सुरक्षा परिषदेच्या या ठरावाला महत्त्व आहे. 

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जागतिक सुरक्षा आणि शांततेला कोणत्याही स्वरूपातला दहशतवाद धोकादायक असल्याचे सुरक्षा परिषदेने मान्य केले आहे. दहशतवादाला थारा देणे, त्यांना आपल्या जमिनीचा वापर करू देणे, त्यांना कोणतीही मदत करणे तातडीने थांबवले पाहिजे, असे सुरक्षा परिषदेने म्हटले आहे. दहशतवादाविरोधात भारताने उघडलेल्या आघाडीला तसेच पुलवामा दहशतवादी हल्ल्यासंदर्भात सुरू असलेल्या तपासाला सर्वच देशांनी मदत केली, पाहिजे असे मत सुरक्षा परिषदेने व्यक्त केले आहे. नाव न धेता पाकिस्तानला सुरक्षा परिषदेने हा इशारा दिला आहे.



दरम्यान, पाकिस्तान पुलवामा हल्ल्यानंतर उलट्या बोंबा मारण्यास सुरुवात केली आहे. पुलवामा हल्ल्यानंतर जगभरातून टीकेची झोड उठलेल्या पाकिस्तानचा कांगावखोरपणा कमी होण्याची चिन्हे नाहीत. पाकिस्तानी लष्कराने आज पत्रकार परिषद घेऊन हल्ल्याबाबत अत्यंत पोकळ दावे केले. हल्ल्यासाठी वापरण्यात आलेली स्फोटके पाकिस्तानी नव्हती. काश्मीरमधील गाडी वापरून काश्मिरी तरुणानेच हल्ला केल्याचा दावा केला. तसेच भारत युद्धाची धमकी देत असल्याचा कांगावा पाकिस्तानी लष्कराचे मेजर जनरल आसीफ गफूर यांनी केला आहे.