नवी दिल्ली : पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर इस्त्रायलने भारताला खुला पाठिंबा दिला आहे. कोणत्याही अटीशिवाय इस्त्रायल पूर्ण मदत करणार आहे. भारताला लागेल तितकी मदत आणि सहकार्य करायला आम्ही तयार आहोत, असे इस्त्रायलने म्हटले आहे. इस्त्रायलचे नवनियुक्त राजदूत डॉ. रॉन मल्का यांनी याबाबत माहिती दिली.पुलवामा अतिरेकी हल्ल्यामुळे देशात युद्धाचे ढग तयार झाले आहेत. भारताने पाकिस्तानवर इस्त्रायलसारखी कारवाई, अशी देशावासियांकडून मागणी होत आहे. जेरुसलेम भारताला कितपत मदत करु शकतो या प्रश्नावर डॉ. रॉन मल्का यांनी हे उत्तर दिले. दहशतवादाविरुद्धच्या लढाईत इस्त्रायलने भारताला बिनशर्त मदत करण्याची तयारी दर्शवली आहे. एक चांगली बाब म्हणजे, मदतीमध्ये कोणती मर्यादा नसेल. भारताला लागेल तितकी मदत आणि सहकार्य करायला आम्ही तयार आहोत, असे डॉ. रॉन मल्का यांनी म्हटले आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे पाकिस्तान पुरस्कृत जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने आतापर्यंत सर्वात मोठा दहशतवादी हल्ला केला. या हल्ल्यात भारताचे ४० जवान शहीद झाले. देशाचे कधीही भरुन न येणारे नुकसान झाले आहे. याबाबत देशात पाकिस्तानबद्दल प्रचंड संताप आहे. पाकिस्तानमध्ये घसून भारताने थेट कारवाई केली पाहिजे, अशी मागणी होत आहे. देशातील सर्व विरोधकांनी मोदी सरकारला पाठिंबा दिला आहे. त्वरीत कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच भारताने सुद्धा इस्त्रायल सारखे धोरण अवलंबून कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. 


इस्त्रायल दहशतवादाविरुद्ध कठोर आणि वेगवान कारवाईसाठी ओळखला जातो. भारताला आपल्या संरक्षणासाठी जी काही गरज लागेल ती मदत करायला आम्ही तयार आहोत. दहशतवादाविरुद्धच्या लढाईत आम्ही आमच्या जवळच्या मित्राला लागेल ती मदत करु. दहशतवाद ही फक्त भारत आणि इस्त्रायलची नव्हे तर संपूर्ण जगाची समस्या आहे, असे मल्का यांनी सांगितले.


५२ वर्षीय मल्का इस्त्रायली लष्करात होते. कर्नल पदावर असताना ते लष्करातून निवृत्त झाले. भारत इस्त्रायलचा महत्वाचा सहकारी आणि जवळचा मित्र असल्याचे आपल्याला पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी सांगितल्याचे मल्का म्हणाले.