दुबई : WION तर्फे आयोजित करण्यात आलेल्या ग्लोबल समिट अर्था वैश्विक परिषदेमध्ये ईशा फाउंडेशनचे संस्थापक सदगुरू यांनी लक्षवेधी वक्तव्य केलं आहे. लोकशाहीच्या मुद्द्यावर वक्तव्य करतेवेळी मानवी संघर्षाचा विषय येतो तेव्हा वस्तूस्थिती चांगल्या पद्धतीने हाताळली जाणं अपेक्षित असल्याचं स्पष्ट केलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ईशा फाऊंडेशनचे संस्थापक म्हणून साऱ्या जगात ओळखल्या जाणाऱ्या सदगुरू यांनी यावेळी दक्षिण आशियाई देशांमध्ये शाशअवत विकास कशा प्रकारे साधला जाऊ शकतो ही बाबही अधोरेखित केली. लोकशाहीमध्ये प्रत्येकाच्याच भावनांचा विचार केला जाऊन त्यांचं मत लक्षात घेणं तितकच गरजेचं असल्याचंही ते म्हणाले. अनेकदा या गोष्टी आव्हानात्मकही ठरतात पण, त्यांकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही.


परिषदेतील उपस्थितांना संबोधित करत आपल्या सत्रात त्यांनी कुपोषितांच्या मुद्द्याकडेही लक्ष वेधलं. या पट्ट्यात जवळपास ३३ टक्के कुपोषित बालकांचं प्रमाण असल्याचं ते यावेळी म्हणाले. लोकशाहीच्या मुद्द्यावर सदगुरुंनी आपले विचार ठेवलेले असतानाच आंतरराष्ट्रीय स्तरावरील पत्रकार रिझ खान यांनीही एका सत्रात आपली मतं उपस्थितांसमोर मांडली. 


'पाकिस्तानातील जनतेलाही काश्मिरमधील लोकांविषयी चिंता वाटत असणार, हे मी ठामपणे सांगतो. कारण, जेव्हा आपण समस्येच्या दिशेने पावलं टाकतो तेव्हा त्या समस्या आणखी वाढू लागतात', असं ते म्हणाले. 


दुबईमध्ये पार पडणाऱ्या WION वैश्विक परिषदेमध्ये माध्यमांचा बदलता चेहरा, भारत- मालदीव यांच्यातील संबंध, राष्ट्रउभारणीसाठीची महिलांची भूमिका अशा इतरही व्यापक मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. जगाच्या पाठीवर भारताचा दृष्टीकोन नेहमीच सादर करण्यात WION ने नेहमीच हातभार लावला आहे.