मुंबई : नुकताच क्रिकेटर सचिन तेंडुलकरचा वाढदिवस पार पडला. त्याचा वाढदिवस म्हटला की,  त्याच्या चाहत्यांमध्ये उत्साह संचारल्याशिवाय राहत नाही.  सचिनवर  असलेलं प्रेम व्यक्त करण्यासाठी त्याचे चाहते दरवर्षी आपापल्या पद्धतीने सचिनचा वाढदिवस साजरा करत असतात. यंदा सचिनचा ५० वा वाढदिवस सांगलीच्या शिराळा तालुक्यातल्या औंढी गावातल्या ग्रामस्थांनी अनोख्या पद्धतीने साजरा केला आणि सचिनला भन्नाट मानवंदना दिली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सचिनच्या वाढदिवसाचा अक्षरशः उत्सव करत या मंडळींनी सचिनवरचं आपलं प्रेम व्यक्त केलं आहे. प्रत्येक  घराच्या दारात रांगोळी,  दरवाज्यावर बॅटच्या गुढी आणि विशेष म्हणजे ढोलताशांच्या गजरात सचिन तेंडुलकरचा मोठा कटआऊट तयार करून जल्लोषात मिरवणूक काढण्यात आली  आणि वडापावचा नैवैद्य दाखवण्यात आला होता.


'सचिन' म्हटलं की काही गोष्टी समोर दिसायला लागतात. क्रिकेटवेड्या फॅन्सनं खचाखच भरलेलं स्टेडियम आणि 'सचिन... सचिन...'चा तो नारा... सचिनने प्रत्येकाला स्वप्न बघायला शिकवलं. स्वप्नांचा पाठलाग करायला शिकवलं.  त्याच्या या शिकवणीने प्रेरित होऊन त्याच्यावर निस्सीम प्रेम करणाऱ्या काही चाहत्यांनी आपला स्वप्नांचा प्रवास पूर्ण केला आहे. विशेष म्हणजे त्यांच्या या स्वप्नांचा प्रवास त्यांनी सचिनला 'तेंडल्या' हा मराठी चित्रपट भेट देऊन पूर्ण केला आहे.  ज्या गावात ही कथा घडली, चित्रपटाचे शूटिंग संपन्न झालं, तिथल्या गावकऱ्यांनी सचिनचा वाढदिवस आज एखाद्या सणासारखा साजरा केला.    


गावाकडे लोक क्रिकेटच्या खेळावर कसं प्रेम करतात? आणि सचिन तेंडुलकरकडे प्रेरणेचा स्त्रोत म्हणून कसे बघतात? याचा अनुभव घेऊन इस्लामपूरच्या मुलांनी त्यावर पटकथा लिहून चक्क 'तेंडल्या' नावाचा सिनेमा बनवला आहे. या चित्रपटाला १ राष्ट्रीय पुरस्कार आणि ५ राज्य पातळीवरील पुरस्कार मिळाले आहेत.  'अश्वमेध मोशन पिक्चर्स'च्या माध्यमातून येत्या ५ मे रोजी 'तेंडल्या' हा मराठी चित्रपट महाराष्ट्रातील चित्रपटगृहांत प्रदर्शित होत आहे.  सचिन तेंडुलकरने स्वतः या चित्रपटाचे कौतुक केलं आहे. 


सुनंदन लेले प्रस्तुत,  सचिन जाधव, चैतन्य काळे निर्मित, 'तेंडल्या' चित्रपटाचे दिग्दर्शन सचिन जाधव, नचिकेत वायकर यांचे आहे. सहनिर्माते तुडीप एंटरटेनमेंट असून कार्यकारी निर्माते चैतन्य काळे आहेत. छायाचित्रण बालू  सॅन्डीलायसा तर संकलन नचिकेत वायकर याचे आहे. कलादिग्दर्शक सुभाष जाधव आहे. संगीत निलेश निर्मला, सारंग कुलकर्णी यांचे आहे.