Milind Gawali: सोमवारी 22 जानेवारीला अयोध्येत प्रभू श्री रामांचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा पार पडला. यामुळे देशातील लाखो रामभक्तांमध्ये आनंद आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. तब्बल 500 वर्षांची प्रतिक्षा संपली, अशी भावना सर्व स्तरावरुन व्यक्त केली जात आहे. त्यातच आता एका प्रसिद्ध मराठी अभिनेत्याने त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याबद्दल सांगितले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'आई कुठे काय करते' ही मालिका सध्या घराघरात लोकप्रिय आहे. या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. ही मालिका टीआरपीच्या शर्यतीतही टॉप पाचमध्ये पाहायला मिळते. आता याच मालिकेत अनिरुद्ध देशमुख ही भूमिका साकारणारे अभिनेते मिलिंद गवळी यांनी प्रभू श्री रामांचा प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी इन्स्टाग्रामवर मालिकेतील एक चित्रीकरणादरम्यानचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. यात त्यांनी अयोध्येतील आमंत्रण का मिळालं नाही, याबद्दल भाष्य केले आहे. 


मिलिंद गवळींच्या 'त्या' पोस्टने वेधलं लक्ष


"कालचा दिवस फार मंगलमय होता, काल राम लल्ला अयोध्येत विराजमान झाले, काल बारा वाजून वीस मिनिटाच्या मुहूर्तावर अयोध्यातील राम मंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा पूर्ण झाले, पाचशे वर्षाच्या संघर्षानंतर, भारतात हिंदुस्थानात हा दिवस उजाडला, 4000 वेगवेगळ्या पंथाचे साधू संत तीन हजारां हुन अधिक vvip अतिथी, शंभरहून अधिक प्रायव्हेट जेट विमान, विमानांना एवढ्या पार्किंगची सोय नसल्यामुळे वेगळ्या राज्यात विमान पार्क केलेली होती, सुपरस्टार्स कलाकार खेळाडू.


कालच्या दिवशी आयोध्येमध्ये आपण पण असायलाच हवं होतं असं असं मला पण वाटत होतं , पण नंतर विचार केला की मला आमंत्रण दिलं नाही कारण माझ्या घरीच राम आहे . वडिलांचं नाव च “श्रीराम” आहे. पण आयोध्येत आणि देशात हा उत्सव चालू असताना मी रामासारखं आपण आपलं कर्तव्य करत राहायचं असं ठरवलं. मी माझं काम म्हणजेच सध्या, “आई कुठे काय करते” या मालिकेचे शूटिंग करत होतो , सकाळी सेटवर पोहोचल्यानंतर नमस्कार गुड मॉर्निंग च्या ऐवजी “जय श्रीराम “म्हणत सगळे एकमेकांचं स्वागत करत होते. आमचे सीन्स पण किती interesting होते बघा, डॉक्टर अभी घर सोडून नोकरी करण्यासाठी कॅनडाला जातो आहे. तो परत केव्हा येईल कधी येईल , येईल की नाही याची कोणाला शाश्वती नाही आहे. त्याचा धाकटा भाऊ यश त्याला मिठी मारून ढसाढसा रडतोय, मग माझ्या ,म्हणजेच अनिरुद्धच्या, म्हणजेच त्याच्या वडिलांच्या पाया पडून निघायला लागतो, आणि मग अनिरुद्ध एक बाप मुलाला मिठी मारून रडतो, माझ्या डोक्यामध्ये सगळं वातावरण इतकं राममय झालं होतं, की serial च्या scenes मध्ये मला वनवास , भरत भेट. असंच काहीसं जाणवत होतं.


डोक्यामध्ये अनेक विचार येत आहेत, की इतका छान राममय वातावरण अख्या जगात झाला आहे तर, रामाची शिकवण आपल्यामध्ये रुजवण्याची गरज आहे असं मला वाटतं. मातृ-पितृ भक्ती, भावंडांवर असीम प्रेम, कर्तव्य, त्याग, कोणाही विषयी कटूता न बाळगणे, सतत प्रसन्न आणि आनंदी राहणे, सत्याचा नेहमी विजय होतो. असं काहीसं आपल्यामध्ये सुद्धा आपण आत्मसात करावं आणि पुढच्या पिढीला ही ते द्यावं. जय श्रीराम", असे मिलिंद गवळींनी म्हटले आहे.



दरम्यान मिलिंद गवळी यांच्या या पोस्टवर अनेक चाहते कमेंट करताना दिसत आहेत. त्यांच्या या पोस्टवर अनेकांनी हार्ट इमोजीचा पाऊस पाडला आहे. तर काहींनी 'खूपच छान अभिनय' असे म्हटले आहे.