मुंबई : बॉलिवूडची क्वीन कंगना रानौत सर्वात चर्चित आणि तितकीच वादग्रस्त अभिनेत्री ठरतेय. आपल्या बेधडक स्वभावासाठी ती ओळखली जात असली तरी तिच्या या स्वभावामुळे अनेक जण कळत-नकळत दुखावलेही जातात... अनेकांना तीचं हे वागणंही खटकतं... काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या 'मणिकर्णिका' या सिनेमाच्या वादातून कुठे बाहेर पडते न पडते तोच कंगनानं आपल्याकडे अनेक बॉलिवूड स्टार्स जाणून-बुजून दुर्लक्ष करत असल्याचा आरोप केला. त्यानंतर कंगनाचा 'मणिकर्णिका' सिनेमाचं शुटींगच्या वेळचा एक युद्ध प्रसंगाचा व्हिडिओ समोर आला... आणि त्याद्वारे कंगनाचं सोशल मीडियावर ट्रोलिंग सुरू झालं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या व्हिडिओमध्ये कंगना खोट्या घोड्यावर बसून युद्ध प्रसंग शूट करताना दिसत आहे. परंतु, कंगनासोबतचे इतर अभिनेते मात्र खऱ्याखुऱ्या घोड्यावर बसून शुटींग करताना दिसत आहेत. झालं... सोशल मीडियावरील ट्रोल आर्मीला निमित्त मिळालं आणि त्यांनी कंगनाला फैलावर घेतलं. कंगनाचा घोडा 'वेलकम' सिनेमातील 'मजनू भाई'च्या पेन्टींगनं खूपच प्रभावित झाल्याची टीकाही लोकांनी केली.


यानंतर मात्र बॉलिवूडमधून अभिनेते अनुपम खेर आणि परेश रावल कंगनाची पाठराखण करण्यासाठी सरसावलेत. कंगनाला ट्रोल करणाऱ्यांना टॅग करत अनुपम खेर म्हणतात, 'किती विष भरलंय या लोकांच्या मनात, ती तर फक्त अभिनय करतेय. मूर्ख ते आहेत जे कंगनाला ट्रोल करत आहेत. हेच तिचं काम आहे आणि पुढची अनेक वर्ष ती तिच्या याच कामासाठी ओळखली जाईल. तिचं नाव वापरून तुम्हा लोकांना केवळ १५ मिनिटांचं फेम मिळतंय...'


त्यावर, परेश रावल यांनीही अनुपम खेर यांची री ओढत 'या मूर्ख लोकांना वाटतं की हॉलिवूडचे सुपरमॅन आणि बॅटमॅन एखाद्या कॅमेरा ट्रिक किंवा सीजी इफेक्टनं नाही तर खरोखरंच उडतात' असं म्हटलंय. 


काही म्हणा, बॉलिवूडच्या सिनिअर अभिनेत्यांकडून कौतुकाचे शब्द ऐकायला मिळाल्यानंतर कंगना मात्र सुखावणार, हे नक्की!


कंगना रानौत आपल्या आगामी 'मेंटल है क्या' या सिनेमात अभिनेता राजकुमार रावसोबत दिसणार आहे.