मुंबई : हिंदी चित्रपट दुनियेमध्ये गेली कित्येक दशकं आधिराज्य गाजवणाऱ्या महानायक अमिताभ बच्चन यांच्या प्रसिद्धीमध्ये आजमितीस तसुभरही कमतरता झालेली नाही. त्या तुलनेने त्यांचा मुलगा अभिनेता अभिषेक बच्चन याला मात्र कलाविश्वात फारशी प्रभावी कामगिरी करता आलेली नाही. अर्थात याला काही चित्रपट अपवादही ठरले. पण, अभिषेकला सातत्य राखणं काही अंशी जमलं नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

२००० साली प्रदर्शित झालेल्या 'रेफ्युजी' या चित्रपटातून अभिषेकनं चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. तेव्हापासूनच अनेकांनीच त्याच्या वडिलांशी म्हणजेच अमिताभ बच्चन यांच्याशी त्याची तुलना करण्यास सुरुवात केली. 
पण, प्रेक्षकांचा मिळणारा प्रतिसाद ही एकमेव गोष्टच तुम्हाला या जगतामध्ये तग धरण्यास मदत करु शकते याच भूमिकेवर अभिषेक ठाम असल्याचं पाहायला मिळालं. 


'खरं सांगावं तर, माझ्या वडिलांनी कधीच माझ्यासाठी म्हणून कोणाला फोन केला नाही. त्यांनी कधीच माझ्यासाठी म्हणून चित्रपट साकारला नाही. उलटपक्षी मीच त्यांच्यासाठी 'पा' या चित्रपटाची निर्मिती केली होती', असं अभिषेक म्हणाला. घराणेशाहीची चर्चा सुरु असताना त्यानं समोर ठेवलेलं हे वास्तव सर्वांची मनं जिंकणारं ठरलं. 


 


मुळात चित्रपटविश्व हा एक व्यवसायच आहे हे पटवून देताना पहिल्या चित्रपटानंतर तुमच्यातलं वेगळेपण त्यांना (प्रेक्षकांना) कळलं नाही किंवा चित्रपटानं चांगली कमाई केली नाही, तर तुम्हाला पुढं कामच मिळणार नाही. कितीही दाहक असलं तरीही हेच वास्तव आहे, ही बाब त्यानं पटवून सांगितली.