मुंबई : बॉलिवूडमध्ये नावारुपास येण्यापूर्वी कलाकार मंडळीच्या वाट्याला येणारा संघर्षही काही चुकलेला नाही. अगदी बच्चन कुटुंबीयसुद्धा याला अपवाद ठरलेले नाहीत. याचं उदाहरण म्हणजे अभिषेक बच्चनची कारकिर्द. जवळपास १८ वर्षांपूर्वी 'रेफ्युजी' या चित्रपटातून अभिनेता अभिषेक बच्चन याने चित्रपट वर्तुळात पाऊल ठेवलं होतं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अभिषेकच्या या चित्रपटाने फारशी चांगली कमाई केली नव्हती. सलग चार वर्षे जवळपास १७ अपयशी चित्रपट देऊनही अभिषेकने जिद्द सोडली नव्हती. अखेर २००४ या वर्षी प्रदर्शित झालेल्या 'धूम' या चित्रपटाने त्याला यश मिळवून दिलं. ज्यानंतर,  'बंटी और बबली', 'गुरू', 'दोस्ताना' अशा चित्रपटांमधून अभिषेक झळकला. अर्थात यामध्ये बिग बी अमिताभ बच्चन यांचा मुलगा असण्याचं दडपण आणि अपेक्षांचं ओझंही त्याच्यावर होतं. 


चित्रपटांना यश न मिळणं ही बाबही त्याला सतावत होती. शालेय शिक्षण पुर्ण केल्यानतंर अभिषेक पुढील शिक्षणासाठी परदेशात केला. पण, चित्रपटांमध्ये काम करण्याच्या इच्छेखातर तो परत आला. मुख्य म्हणजे रुपेरी पडद्यावर अपयशी ठरलं असता त्याने चित्रपट न मिळाल्यामुळे LIC एजंट, म्हणूनही काम करण्याचा प्रयत्न केला होता असंही म्हटलं जातं.



एक कलाकार म्हणून अभिषेकने अनुभवलेला संघर्षाचा काळ त्याला बरंच काही शिकवून गेला. काही मोजक्या चित्रपटांतून तो नावारुपास आला असला तरीही, त्याचे चित्रपट हे कायमस्वरुपी छाप पाडणारे होते. 



'पा' या चित्रपटात भूमिका साकारणाऱ्या अभिषेक बच्चन याच्या नावे विश्वविक्रमाचीही नोंद आहे. स्वत:च्याच वडिलांची भूमिका अभिषेकने साकारली होती. तर, अमिताभ बच्चन यांनी अभिषेकच्या मुलाची भूमिका साकारली होती. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्येही याची नोंद करण्यात आली होती.