मुंबई : चित्रपट विश्व किंवा एकंदरच कला वर्तुळात नाती कधी नावारुपास येतात आणि कधी या नात्यांमध्ये दुरावा येतो, याचा अनेकदा अंदाज लागत नाही. बऱ्याच सेलिब्रिटी जोड्यांच्या बाबतीत असं घडल्याचं आजवर पाहायला मिळालं आहे. कारणांमध्ये भिन्नता असली तरीही अमुक एक सेलिब्रिटी जोडी वेगळी होणार असं म्हटलं की चाहत्यांना धक्काच. अभिनेता हृतिक रोशन आणि त्याची पूर्वाश्रमीची पत्नी सुझॅन खान यांचं नातंही तसंच काहीसं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनेक वर्षांच्या वैवाहिक नात्यात दुरावा आल्यानंतर हृतिक आणि सुझॅनने विभक्त होण्याचा निर्णय घेतला. २०१४ मध्ये बॉलिवूड विश्वातील ही सेलिब्रिटी जोडी वेगळी झाली. पण, त्यानंतरही त्यांच्या नात्यातील समीकरण मात्र फारसं बदललं नाही. 


हृतिक आणि सुझॅन एकमेकांचे फार चांगले मित्र तर आहेतच. सोबतच पालक म्हणूनही ते प्रत्येक वेळी मोठ्या जबाबदारीने मुलांच्या पाठीशी एकत्र उभे राहिले. त्यांचा हा अंदाज पाहता अनेकदा ते पुन्हा एकत्र येणार असल्याच्या चर्चांनीही जोर धरला होता. सुझॅनोबतच्या याच नात्याविषयी हृतिकने अतिशय संवेदनशीलपणे काही गोष्टी स्पष्ट केल्या आहेत. 


‘जीक्यू मासिका’ला दिलेल्या मुलाखतीत त्याने या नात्याची अव्यक्त बाजू सर्वांसमोर ठेवली.  खलील जिब्रान यांच्या एका वक्तव्याचा संदर्भ देत हृतिने सांगितलं, ‘प्रेम म्हणजे दोन महत्त्वाच्या आधारांवर स्थिरावलेलं एक मंदिर आहे. ते एक झाले तर मंदिर ढासळेल. त्यांचं स्वत:चं वेगळं अस्तित्वच अधिक भक्कम असणं गरजेचं आहे. तेव्हाच प्रेमाचं हे मंदिर आणखी विस्तारेल. मोठं होईल. 


नात्यामध्ये प्रत्येकाचं स्वतंत्र अस्तित्व अतिशय महत्त्वाचं असतं, असं म्हणत भावनिक गरजा भागवण्यासाठी स्वत: तत्पर राहणंही तितकंच गरजेचं असल्याची बाब त्याने स्पष्ट केली. 


सुझॅनसोबतच्या नात्याविषयी पुढे तो म्हणाला, ‘हे अतिशय सुरेख नातं आहे. आमच्या मुलांसोबतचं.... आणि मित्र म्हणून एकमेकांसोबतचं. पण, यातही एक गोष्ट मात्र खरी की प्रेमाचं रुपांतर कधीच रागामध्ये होऊ शकत नाही. जर तो राग असेल, चीड किंवा घृणा असेल, तर मग ते प्रेमच नव्हतं. प्रेमाच्या नाण्याची दुसरी बाजूही प्रेमच असते हे जेव्हा तुम्ही लक्षात घ्याल तेव्हात प्रेमातच्या या वाटा तुम्हाला उमगतील.’ 


सुझॅन आणि हृतिकचं हे अनोखं नातं सर्वांसमक्ष ठेवत त्याने बऱ्याच चर्चांना पूर्णविराम दिला. बॉलिवूडमध्ये ‘ग्रीक गॉ़ड’ म्हणून ओळखला जाणारा हृतिक येत्या काळात ‘सुपर ३०’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याच्यासोबत टेलिव्हीजन अभिनेत्री मृणाल ठाकूर हिसुद्धा स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.