मुंबई : अभिनेत्री कतरिना कैफ सध्या आगामी चित्रपटांच्या तयारीत व्यग्र आहे. येत्या काळात ती अली अब्बास जफरच्या भारत आणि रोहित शेट्टीच्या सुर्यवंशी या चित्रपटांतून प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज आहे. अभिनय विश्वात कतरिनाच्या कारकिर्दीत बरेच टप्पे आले, ज्यामुळे तिला एक व्यक्ती म्हणून आणि अभिनेत्री म्हणूनही घडण्यास मदत झाली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'डीएनए'ला दिलेल्या मुलाखतीत कतरिनाने सध्याच्या घडीला तिच्या आयुष्यात बरीच सकारात्मकता आल्यातं सांगितलं. अमुक एक गोष्ट न शिकण्याचा, नव्याने शिकण्याचा आणि असंख्य गोष्टी जाणून घेण्याच्या टप्प्यावर आपण आता असल्याचं ती मुलाखतीत म्हणाली. एक व्यक्ती म्हणून आपल्यात बदल झाल्याची बाबही तिने स्वीकारली. आयुष्यात अपयशाचाही सामना करणारी कतरिना या संपूर्ण प्रवासात आपण खूप काही पाहिल्याचंही न विसरता म्हणाली. 


भावनिकदृष्ट्या आलेल्या प्रत्येक चांगल्या आणि वाईट अनुभवातून आपण खूप काही शिकल्याचं तिने स्पष्ट केलं.  'या जीवनात आतापर्यंत मला बऱ्याच अनपेक्षित वळणावर आणून सोडलं आहेत.  या साऱ्यामध्ये मी स्वत:विषयी बरंच जाणत गेले. भावना, दु:ख, प्रेम आणि विश्वासघात यातून मी खूप काही शिकले. विश्वासार्हतेविषयी असणारा समजुतदारपणा माझ्यात आला. आयुष्याकडे पाहण्याचा माझा दृष्टीकोन आणखी प्रगल्भ झाला. या साऱ्याचा वापर मी माझ्या कामात करुन घेतला', असं कतरिना म्हणाली. 



कलाविश्वात कतरिनाच्या वाट्याला यश येत असतानाच एका टप्प्यावर तिच्या खासगी आयुष्यात मात्र वादळ आलं होतं. जवळच्या व्यक्तींसोबतच्या नात्यात दुरावा आला होता, रणबीरसोबतचं तिचं नातं संपुष्टात आलं होतं. अशा वेळी परिस्थितीनुरूप स्वत:ला आधार देत कतरिनाने प्रसंगाना तोंड दिलं होतं. 


शाहरुख खानची महत्त्वाची भूमिका असणाऱ्या 'झिरो' या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर फारशी चांगली दाद मिळाली नाही. पण, आनंद एल. राय दिग्दर्शित या चित्रपटातील कतरिनाची भूमिका मात्र प्रेक्षकांच्या प्रशंसेस पात्र ठरली. त्यांनी दिलेल्या याच संधीबद्दल कतरिनाने कृतज्ञतेची भावनाही व्यक्त केली.