Raveena Tandon on Prem Qaidi: बॉलिवूडमध्ये 90 च्या दशकात अनेक अभिनेत्रींनी मोठ्या पडद्यावर राज्य केलं. आघाडीच्या या अभिनेत्रींमध्ये रवीना टंडनचाही (Raveena Tandon) समावेश होता. 'पथ्थर के फूल' (Patthar Ke Fool) चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या रवीनाने अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. दरम्यान, रवीनाने अशा अनेक चित्रपटांमध्ये काम करण्यास नकार दिला जे नंतर बॉक्स ऑफिसवर (Box Office) सुपरहिट झाले. यामधीलच एक चित्रपट म्हणजे 'प्रेम कैदी' (Prem Qaidi). रवीनाने नुकतंच एका मुलाखतीत 'प्रेम कैदी' चित्रपटासाठी आपण पहिली पसंती होती असा खुलासा केला आहे. मात्र हा चित्रपट नाकारण्याचं कारण त्यापेक्षाही जास्त धक्कादायक आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

90 च्या दशकात आलेल्या 'प्रेम कैदी' चित्रपटात करिश्मा कपूर आणि हरिश कुमार मुख्य भूमिकेत होते. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता. पण या चित्रपटासाठी करिश्मा नव्हे तर आपण पहिली पसंती होतो असा खुलासा रवीनाने ETimes ला दिलेल्या मुलाखतीत केला आहे. पण रवीनाने हा चित्रपट करण्यास नकार देण्यामागे एक कारण होतं. हे कारणही तिने या मुलाखतीत सांगितलं आहे. 


"मी वेंकटेशसह प्रेम कैदी करण्यास नकार दिला. कारण त्यात एक सीन होता ज्यामध्ये माझ्या पँटची चेन खोलली जाते. मला हा सीन करावा लागेल हे समजल्यानंतर धक्काच बसला होता. मी हा सीन कसा काय करु शकते असा विचार करत होते. त्यामुळे मी त्यास नकार दिला," असा खुलासा रवीना टंडनने केला आहे. 


पण 'प्रेम कैदी'ने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आणि रवीनाने एक सुपरहिट चित्रपट गमावला. याबद्दल बोलताना तिने सांगितलं की, मी अशा अनेक चित्रपटांना नकार दिला आहे जे नंतर सुपरहिट झाले. "बॉक्स ऑफिसवर यशस्वी होऊ शकतील असे अनेक चित्रपट करण्याची क्षमता असतानाही तू त्यात काम का करत नाही याची मला आजही विचारणा होते. पण निर्भया घटनेनंतर मला खूप धक्का बसला होता. मी पूर्णपणे हलले होते. त्यामुळे 'मात्र' सारखा चित्रपट करणं माझ्यासाठी गरजेचं होतं. भ्रष्टाचार वाढलेला असताना मी 'शूल' चित्रपट केला. नंतर मी बलात्कारावर आधारित 'जागो' चित्रपटात काम केलं," असं रवीनाने सांगितलं. 


पुढे तिने सांगितलं की "मी एक व्यावसायिक अभिनेत्री होती. पण नंतर माझी विचारसरणी बदललली. एकदा मी सुनील शेट्टीसोबत शूट करत होते. त्यावेळी एका गाण्यावर डान्स करत असताना अचानक मला जाणीव झाली. मी कधीपर्यंत हेच करत राहणार आहे, एक अभिनेत्री म्हणून माझी वाढ कधी होणार अस विचार माझ्या मनात आला आणि विचार बदलले. कामात तोचपणा असल्याची जाणीव मला झाली. जेव्हा असं होतं तेव्हा आपण फार कंटाळवाणे होतो".


"आता मला फक्त आव्हानात्मक भूमिका करायच्या आहेत. खासकरुन सामाजिक मुद्द्यांवर भाष्य करणाऱ्या भूमिका निवडायच्या आहेत. लोक फार लवकर गोष्टी विसरतात त्यामुळे हे मुद्दे जिवंत ठेवणं गरजेचं आहे," असं रवीनाने म्हटलं आहे.