श्रीदेवी यांच्या मृत्यूवर अनेक प्रश्न, का भडकले बॉलिवूड कर?
श्रीदेवीचा आकस्मित मृत्यू सगळ्यांनाच चटका लावून गेला आहे.
मुंबई : श्रीदेवीचा आकस्मित मृत्यू सगळ्यांनाच चटका लावून गेला आहे.
एका कौटुंबिक लग्नसोहळ्यात सहभागी होण्यासाठी दुबईला गेली असता रविवारी पहाटे श्रीदेवी यांचा मृत्यू झाला. दोन दिवसांपूर्वी कार्यक्रमात नाचत गात असलेल्या श्रीदेवी अचानक हे जग सोडून गेल्या.
दुबईच्या हॉटेलमध्ये बेशुद्ध अवस्थेत असलेल्या श्रीदेवी यांच्या निधनावर आता अनेक चर्चा होत आहे. त्यांच्या मृत्यूवर अनेक प्रश्न विचारले जात आहेत. असं म्हटलं जातंय की, श्रीदेवी यांना हृदयाशी संबंधीत कोणतीच समस्या नव्हती. असंख्य सर्जरींमुळे श्रीदेवी यांचा मृत्यू झाला अशी चर्चा होत आहे. यावर बॉलिवूड कलाकार भडकले आहेत त्यांनी सोशल मीडियावर याविरूद्ध आवाज उठवला आहे.
काय म्हणाले बॉलिवूडमधील मंडळी
एकता कपूर यांनी ट्विट केलं आहे की, वाईट लोकांनो, 1 टक्के लोकांना हृदयाची कोणतीही समस्या नसतानाही त्यांचा मृत्यू हा कार्डिएक अरेस्टने होतो. तुम्ही चुकीची भावना पसरवत आहात.
तर सेलीना जेटली या अभिनेत्रीने म्हटलंय की, जर तुम्ही देखील माझ्याप्रमाणे श्रीदेवीच्या चाहत्या असाल तर असे प्रश्न निर्माण करणे बंद करा. कारण आता त्यांच्यासाठी आणि त्यांच्या परिवारासाठी खूप कठीण गोष्ट आहे.
लेखिका मधु किश्वर यांनी देखील श्रीदेवी यांच्या मृत्यूवर शंका व्यक्त केली. डायटिंग आणि साइज झीरोसाठी केली गेलेली ट्रिटमेंट यामुळे हा मृत्यू तर झाला नाही असा प्रश्न त्यांनी उभा केला. त्यांच्या या प्रश्नावर अभिनेत्री स्वरा भास्कर भडकली असून त्यांचं ट्विट रिट्विट करून श्रीदेवी यांच्या मृत्यू प्रकरणी थोडी संवेदनशीलता दाखवा असा सल्ला दिला आहे.