मुंबई :  सध्याच्या घडीला संपूर्ण कलाविश्वात सुरु असणाऱ्या चर्चा पाहता निर्माते आणि दिग्दर्शक संजय लीला भन्साळी, भुषण कुमार आणि निर्माते महावीर जैन यांनी अभिषेक कपूरसह एकत्र येत एका महत्त्वाच्या विषयावर चित्रपट साकारण्याचं ठरवलं आहे. हा महत्त्वाचा विषय म्हणजे बालाकोट एअरस्ट्राईक. पाकव्याप्त काश्मीरमध्ये जाऊन दहशतवादी तळ उध्वस्त करण्याची कामगिरी भारतील वायुदलाने पार पाडली होती. याच धर्तीवर आता चित्रपट साकारला जाणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संजय लीला भन्साळी यांच्या निर्मिती संस्थेकडून सोशल मीडियावर याविषयीची माहितीसुद्धा देण्यात आली आहे. त्यामुळे आता या चर्चांवर शिक्कामोर्तब होत आहे. 'एक अशी गाथा ज्यामध्ये भारतीय वायुदलाचं साहस पाहता आलं.... ती म्हणजे २०१९मधील बालाकोट एअरस्ट्राईक', अशा शब्दांत या ट्विटरच्या माध्यमातून चित्रपट रुपेरी पडद्यावर साकारला जाणार असल्याचं सांगण्यात आलं. 


'एअरस्ट्राईक'साठी बालाकोटची निवड का? अशी होती रणनीती...


सूत्रांच्या माहितीनुसार या चित्रपटातून होणाऱ्या कमाईचा मोठा भाग हा सैन्यदल सहायता निधीमध्ये देण्यात येणार आहे. शिवाय बऱ्याच मोठ्या आणि तितक्याच प्रसिद्धीझोतात असणाऱ्या चेहऱ्यांची या चित्रपटासाठी वर्णी लागण्याची चिन्हं असल्याचंही म्हटलं जात आहे. तेव्हा आता या चेहऱ्यांणध्ये नेमकी कोणाची नावं पुढे येतात आणि येत्या काळात रुपेरी पडद्यावर कशा प्रकारे हा एअरस्ट्राईक साकारला जातो, यावर अनेकांचं लक्ष असेल. 




कधी आणि का झालं होतं एअर स्ट्राईक? 


जम्मू-काश्मीरच्या पुलवामा येथे १४ फेब्रुवारी २०१९ रोजी आत्मघातकी दहशतवादी हल्ला करण्यात आला होता. यामध्ये सीआरपीएफचे ४० जवान शहीद झाले होते. या हल्ल्याची जबाबदारी 'जैश ए मोहम्मद'ने स्वीकारली होती. याच हल्ल्याची परतफेड करण्यासाठी म्हणून भारताकडून बालाकोट एअर स्ट्राईकची कारवाई करण्यात आली. 'मिराज २०००' या लढाऊ विमानांच्या सहाय्याने १००० किलो स्फोटकांचा वापर करून 'जैश ए मोहम्मद' या दहशतवादी संघटनेच्या तळांना भारतीय वायुसेनेने निशाणा करत ही कारवाई केली होती.