मुंबई : गायक, सूत्रसंचालक आदित्य नारायण याचं नाव श्वेता अग्रवाल हिच्याशी जोडलं गेलं होतं. पण, अनेकांसमर झालेल्या एका वादानंतर त्यांच्या नात्यात ठिणगी पडल्याचंही म्हटलं गेलं. पण, सत्य मात्र जरा वेगळं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आदित्य आणि श्वेता दहा वर्षांहून अधिक काळापासून एकत्र आहेत. इतकंच नव्हे तर, यंदाच्या वर्षअखेरीस ते दोघंही लग्नबंधनात अडकणार आहेत. डीएनएनं प्रसिद्ध केलेल्या वृत्तनुसार आदित्य त्याच्या या नात्याबाबत म्हणाला होता, 'मी श्वेताला शापितच्या सेटवर भेटलो होतो. तेव्हात आम्ही एकमेकांकडे ओघाओघानं वाहत गेलो. हळूहळू मी तिच्या आकंठ प्रेमात बुडाच्याची अनुभूती मला झाली. सुरुवातीला तिला या नात्यात फक्त मैत्री हवी होती. कारण आम्ही दोघंही अगदीच तरुण होतो, त्यामुळं करिअरवर लक्ष केंद्रीत करण्याची तेव्हा गरज होती. मागील दहा वर्षांमध्ये कोणत्याही प्रेमसंबंधांप्रमाणं, नात्यांप्रमाणं आम्हीही अनेक चढ- उतार पाहिले. सध्या लग्न ही आमच्यासाठी फक्त एक औपचारिकता आहे. जी नोव्हेंबर किंवा डिसेंबर महिन्यात पार पडेल. माझ्या आईवडिलांनाही श्वेता फार आवडते. आयुष्यभराची जोडीदार मला तिच्या रुपात भेटली याचा मला फार आनंद आहे'. 


 


श्वेतासोबतचा वाद आणि ब्रेकअपच्या चर्चांबाबतही त्यानं वक्तव्य केलं. काही वर्षांपूर्वी श्वेता आणि माझ्यात वाद झाला, त्यानंतर ब्रेकअप झालं असा अनेकांचाच समज झाला असं सांगत त्यानंतर श्वेतासोबत कुठं जाणंही कठिण झाल्याचं आदित्यनं स्पष्ट केलं. कोणत्याही नात्यात अशी वळणं येतात. पण, नात्यांची वाट तिथंच संपत नाही हे आपल्याला कळून चुकलं असं सांगत हे नातं आणखी परिपक्व करण्यासाठीच आपण वेळ घेत असल्याचं आदित्यनं सांगितलं. शिवाय या नात्याला एका वेगळ्या वळणावर नेण्याची ही योग्य वेळ असल्याचं सांगत त्यानं आनंद व्यक्त केला.